निट्टूर, इदलहोंड, गणेबैल भागातून समितीला भक्कम पाठिंबा
प्रतिनिधी /खानापूर
सीमाप्रश्नाच्या लढय़ाचा प्रदीर्घ काळ पाहता आज आपण एकत्र येणे काळाची गरज असून प्रलंबित असलेला सीमाप्रश्न सोडवून घेणे गरजेचे आहे. आता एकीच्या प्रक्रियेमुळे समिती कार्यकर्त्यांत उत्साह व नवचैतन्य संचारले आहे. गावोगावी कार्यकर्त्यांना सक्रिय करून घेण्यासाठी जागृती मेळावे करण्यात येत आहेत. त्यात कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा व समितीला बळकटी आणावे, असे आवाहन डॉ. एल. एच. पाटील यांनी इदलहोंड येथील बैठकीत बोलताना केले.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, इदलहोंड गावाने नेहमी सीमालढय़ात वेगळे योगदान दिले आहे. यापुढील काळातही इदलहोंड पंचक्रोशीतील गावे निश्चितच समितीच्या पाठिशी राहतील, असे सांगितले.
यावेळी गोविंद जाधव, नागेश पाटील, महादेव पाखरे यासह अनेकांनी आपले विचार मांडले. तर निट्टूर येथे सुभाष नार्वेकर, नानू नार्वेकर यांनी गावच्यावतीने जबाबदारी स्वीकारून निट्टूर गाव समितीच्या पाठीशी खंबीरपणे राहील, असे आश्वासन दिले. यावेळी दत्तू पाखरे, यशवंत पाटील, सागर पाटील, रमेश पाटील, सिद्धाप्पा कोलकार, पंडित पाटील, शंकर पाटील, नागेश पाटील, मल्लाप्पा जाधव, दत्तू जाधव, संतोष पाटील यासह समिती कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या दौऱयात प्रत्येक गावात समिती कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे बैठकीत सहभाग घेतला होता.