एनसीबी महासंचालकांकडून दिल्लीत चौकशी पूर्ण – केंद्र सरकार वानखेडेंना पुन्हा कस्टममध्ये पाठवणार
प्रतिनिधी/ मुंबई
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील कारवाईनंतर वादात सापडलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बदली होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. खंडणीचा आरोप झाल्यानंतर वानखेडे यांना दिल्लीत बोलावून चौकशी करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा कस्टम विभागात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर केलेल्या कारवाईनंतर समीर वानखेडे खऱया अर्थाने चर्चेत आले होते. परंतु ही कारवाई बोगस असल्याचा आरोप सर्वात आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्याबाबत त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. त्यांनी समीर वानखेडे यांनाही लक्ष्य करत आरोपांच्या तोफा डागल्या होत्या. अखेरीस हळूहळून समीर वानखेडे हेच या सगळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप मलिक यांनी केला.
भाजपच्या काही लोकांच्या सांगण्यावरून वानखेडे हे बॉलिवूमधील कलाकारांना लक्ष्य करत असल्याचे नबाब मलिक म्हणाले. वानखेडे हे खोटय़ा प्रकरणात लोकांना अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसुली करत असल्याचाही आरोप मलिक यांनी केला. स्वतःच्या जावयाच्या प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईचा घटनाक्रम सांगत मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
आर्यन खान प्रकरणात पंच असलेला किरण गोसावी याच्या बॉडीगार्डने एक व्हिडिओ व्हायरल करून 8 कोटींची खंडणी घेतल्याचा आरोप केल्यानंतर वानखेडे अधिकच अडचणीत आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होताच एनसीबीच्या महासंचालकांनी वानखेडे यांना दिल्लीत बोलविले आहे. तिथे त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
वानखेडे दिल्लीत असतानाच इकडे राज्यात नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. एनसीबीच्याच एका अधिकाऱयाचे निनावी पत्र जाहीर करून त्यांनी या प्रकरणाची आणखीनच चर्चा घडवून आणली. समीर वानखेडे यांनी एनसीबीमध्ये नियुक्ती कशी झाली? खोटय़ा कारवाया करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र टीम कशी तयार केली आहे? त्यात कोणा-कोणाचा समावेश आहे? हे पत्रातून समोर आले आहे. त्यामुळे वानखेडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. वानखेडेंवरील आरोपामुळे एनसीबीची प्रतिमा मलिन होत असल्याचीही एक चर्चा आहे. त्यामुळे वानखेडे यांची बदली होण्याची शक्यता असल्याचे या सुत्रांनी सांगितले.
आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या ःक्रांती रेडकर यांचा आरोप
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपांमुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत आले असतांनाच त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. मला, मुलांना, कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही क्रांती रेडकर यांनी केला आहे. समीर वानखेडे सत्याच्या मार्गाने काम करतात, ते अनेकांना खटकते.या प्रकरणातून समीर वानखेडे बाहेर पडतील. नेहमी सत्याचा विजय होतो. तेव्हा मला त्याची काहीही काळजी वाटत नाही. समीर हे निर्दोष आहेत, असे रेडकर म्हणाल्या.
जास्मीन वानखेडेंचीही पत्रकार परिषद
दरम्यान, वानखेडे यांची बहिणी जास्मिन वानखेडे यांनीही पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना जास्मिन यांनी बोलताना नवाब मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ’पुरावे असतील तर कोर्टात जावं, ट्वीट करुन लोकांचा वेळ वाया का घालवता?’, असं म्हणत जास्मिन वानखेडे यांनी थेट आवाहन केलं आहे. तसेच मला, कुटुंबाला रोज धमकीचे, जीवे मारण्याचे फोन येताहेत, असंही जास्मिन वानखेडे यांनी बोलताना सांगितलं.