प्रतिनिधी/ कारवार
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत. तथापि जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने गुरुवारी रात्री साजऱया होणाऱया कार्यक्रमांवर निर्बंध लादल्याने अनेकांसमोर कठीण प्रसंग निर्माण झाला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहेत. गुरुवारी दुपारी 4 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 6 पर्यंत कारवार जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार के. यांनी किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर व भटकळ तालुक्यातील समुद्रकिनाऱयावर ऐतिहासिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. 31 डिसेंबर रोजी बहुतेक पाटर्य़ांचे आयोजन समुद्र किनाऱयावरच केले जाते. तथापि जिल्हा प्रशासनाने समुद्र किनाऱयावर 144 कलम लागू केल्याने अनेकांची निराशा झाली आहे.
31 डिसेंबरच्या बाबतीत कारवार जिल्हा प्रशासनही सक्रिय झाले आहे. 31 डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱयावर हजारो कुटुंबे दाखल होतात. तथापि जिल्हा पोलीस प्रमुख शिवप्रसाद देवराजू यांनी ड्रोनच्या माध्यमातून किनारपट्टीची पाहणी करण्यात येईल, असा इशारा दिल्याने किनाऱयावर जायचे की नाही याबद्दल जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.
गुरुवारमुळेही अनेकांची पंचाईत
31 डिसेंबरची रात्र साजरी करणे म्हणजे चिकन, मटण, मासळी आणि मद्यावर (अपवाद आहे) यथेच्छ ताव मारणे. तथापि गेल्या एक दिवसांपासून बांगडय़ाचा अपवाद वगळता अन्य मासळीच्या आवकेमध्ये घट झाली आहे. त्यामुळे मासळी प्रेमीसह केवळ मासळीवर ताव मारण्यासाठी अन्य ठिकाणाहून येथे दाखल होणाऱया खवय्यांची फार मोठी पंचाईत झाली आहे. त्याचबरोबर 31 डिसेंबरच गुरुवारी आल्यानेही पार्टीपेमींची निराशा झाली आहे. कारण गुरुवारी येथील अनेकजण मांसाहार सेवन करीत नाही.
निवडणुकीतील विजय आजही साजरा करता येणार नाही
बुधवारीच ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल लागले. तथापि विजयी उमेदवारांना किंवा समर्थकांना विजयाचा आनंद लुटता आला नाही. याची महत्त्वाची कारणे म्हणजे उशिरा लागलेले निकाल आणि मतमोजणीनिमित्त जिल्हा प्रशासनाने मद्यविक्रीवर घातलेली बंदी त्यामुळे अनेक विजयी उमेदवारांनी 31 डिसेंबरचे औचित्य साधून पाटर्य़ांचे नियोजन केले होते. तथापि प्रशासनाच्या कडक धोरणामुळे अनेकांच्या रंगाचा बेरंग झाला आहे.
पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल
कारवार जिल्हय़ात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो पर्यटक वेगवेगळय़ा ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील मुर्डेश्वर व गोकर्ण या दोन आघाडीच्या पर्यटनस्थळासह जिल्हय़ातील अन्य पर्यटनस्थळेही हाऊसफुल्ल झाली आहेत. किनारपट्टीवरील बहुतेक सर्व समुद्र किनारे पर्यटकांच्या उपस्थितीने फुलून गेले आहेत.
गोव्याच्या दिशेने वाहनांची रीघ
अलीकडच्या वर्षात 31 डिसेंबर गोव्यात साजरा करण्याच्या विचाराने मोठी गती घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकातील वेगवेगळय़ा शहरातील हजारो नागरिक याची अगोदरच तजवीज करतात. कर्नाटकासह दक्षिण भारतातील अन्य काही राज्यातील नागरिक अनमोड किंवा कारवार मार्गे गोव्यात दाखल होत असतात. त्यामुळे येथील राष्ट्रीय हमरस्त्यावरून गोव्याकडे कूच करणाऱया वाहनांची रीघ लागली आहे. वाहनांमध्ये आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू राज्यातील वाहनांचाही समावेश आहे.