ऑनलाईन टीम / पुणे :
समृद्ध आरोग्य ही सर्वसामान्यांची प्राथमिकता असताना आज आरोग्य यंत्रणेपुढे अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाताना सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून समृद्ध आरोग्य यंत्रणा उभी करणे ही आगामी काळातील प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ स्व. ॲड. रावसाहेब शिंदे यांचा स्मृतीदिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना राजेश टोपे बोलत होते. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आणि कृषितज्ज्ञ विलास शिंदे यांना कृषि क्षेत्रातील कार्यासाठी राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते यंदाचा स्व.रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राजेश टोपे म्हणाले की, मनुष्यबळाची कमतरता कमतरता, मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आणि निधी अशी अनेक आव्हाने आरोग्य यंत्रणेपुढे आ वासून उभी आहेत. कोरोनाने सर्वच यंत्रणांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले असून जगण्याचे प्राधान्यक्रम बदलविण्यास भाग पाडले आहे. सर्वांना परवडणारी, विश्वासार्ह आणि घराच्या जवळ सहज उपलब्ध होईल अशी आरोग्य सेवा देणे ही काळाजी गरज आहे. कोरोनाचा पुण्यात उद्रेक झाला होता. पुण्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनचा मदतीचा हात मिळाला नसता, तर पुण्यातील कोरोना आटोक्यात आणणे कठीण होते. आरोग्याचा रथ हा जगन्नाथाचा रथ असून तो सगळ्यांच्याच मदतीने तो आपल्याला इच्छित स्थळापर्यंत खेचून न्यायचा आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतक-यांना देशद्रोही ठरवण्याचे जे कारस्थान केल जात आहे, ते पाहता अण्णासाहेब आणि रावसाहेब हे प्रचंड अस्वस्थ झाले असते. कृषि, आरोग्य आणि साहित्य या तिनही क्षेत्रात रावसाहेबांना सहजपणे मुशाफिरी केली. या तिनही क्षेत्रात त्यांनी उभे केलेले काम आजही दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहे. अण्णासाहेब आणि रावसाहेब यांनी एकमेकांच्या कर्तृत्वाची छाप एकमेकांवर उमटू दिली नाहीत. ही दोन्ही व्यक्तिमत्वे वेगळी होती. पुरोगामीत्व हे रावसाहेबांचे व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी ते शेवटपर्यंत जपले.