प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील कंत्राटदारांची रु. 500 कोटींची बिले थकलेली आहेत. त्यातच 30 जून पर्यंत आयकर खात्याकडे परतावा सादर करायचा असल्याने त्यासाठी कर भरण्यास देखील पैसे नसल्याने कंत्राटदार अडचणीत आलेले आहेत.
कंत्राटदारांमधील वाढत्या असंतोषावर सरकार देखील कोणताही तोडगा काढू इच्छीत नाही. सरकारच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. कंत्राटदारांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारकडून कंत्राटदारांची देणी सुमारे रु. 500 कोटींची आहेत. आयकर खात्याकडे परतावा भरण्याची तारीख आता 30 जून पर्यंत आहे.
बांधकामे पूर्ण, पण बिले मिळाली नाही : गाडगीळ
कंत्राटदार विनोद गाडगीळ यांनी सांगितले की, आम्ही सरकारी बांधकामासाठी ऑर्डर्स मिळविल्या व बांधकामे पूर्णही केली. मात्र आम्हाला खर्चाची बिले मिळाली नाहीत. ही बांधकामे करताना आम्ही बँकांकडून कर्जे घेतलेली असतात.
बँकांनी कर्जाचे हप्ते फेडायला सांगितले, आम्ही कोठून भरणार हप्ते. सरकारने कंत्राटदारांचे पैसे दिलेले नाहीत. बांधकामे करण्यापूर्वी सामान खरेदी करताना संपूर्ण जीएसटी भरलेला आहे. आता जीएसटीचे इनपूट परताव्यावर दाखविण्यात आले. परंतु परतावा अर्ज भरताना त्यांनी इनपूट फेटाळून लावलेला आहे. म्हणजे नव्याने कर भरा. अगोदरच सरकारकडून रक्कम आलेली नाही. त्यात परतावा भरतेवेळी रक्कम भरा नाहीतर अर्ज स्वीकारला जात नाही. अशावेळी करायचे तरी काय? असा प्रश्न आहे.
असंख्य व्यापारीही अडचणीत येणार
मुळात आम्ही आमचे उत्पन्न म्हणून दाखविणार तर त्यासाठीचे पैसेच आमच्याकडे आले नाहीत तर मग परतावा अर्ज तर कसा भरायचा? असा सवाल गाडगीळ यांनी केला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे केवळ कंत्राटदाराच नव्हे तर असंख्य व्यापारी देखील आयकर परतावा भरण्यास जातील त्यावेळी अडचणीत आलेली असतील, असे ते म्हणाले.