कंपनी रुळावर आल्यावर सरकार होणार बाजूला
नवी दिल्ली
देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियामध्ये भलेही सरकार सर्वाधिक हिस्सा घेत मालक होणार असेलही परंतु कंपनीच्या संचालक मंडळासह कंपनीच्या अन्य व्यवहारामध्ये सरकारचा सहभाग नसणार असल्याची माहिती आहे. यासोबतच कंपनीच्या समभागांचे मूल्य हे बुधवारी 10 टक्क्यांनी चढल्याचे दिसले आहे. हाच समभाग मात्र मंगळवारच्या सत्रात 20 टक्क्यांनी घसरला होता.
व्होडाफोन आयडियाचे व्यवहार (कारभार)आणि सर्व काही उपक्रम पूर्वीप्रमाणे सुरु राहणार आहेत. सरकार फक्त यातील 35.80 टक्के मालकी प्राप्त करणार आहे. सरकार ना कोणत्याही संचालक मंडळावर किंवा अन्य कोणत्याही स्थानावर राहणार नसल्याचे संकेत आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा व्होडाफोन आयडिया स्थिर होईल तेव्हा म्हणजे सर्व कर्ज आणि अन्य समस्यांमधून मुक्त होत कंपनी मूळ मार्गावर येईल तेव्हा सरकार कंपनीमधून बाहेर पडण्याची योजना आखणार असल्याची माहिती आहे.
अर्थ मंत्रालयासोबत चर्चा
डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम म्हणजे डॉट यासंदर्भात अर्थ मंत्रालयासोबत लवकरच चर्चा करणार आहे. कारण कर्जाला इक्विटीमध्ये बदलण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी योजना आखण्यावर विचार विनिमय करण्यात येणार असल्याची माहिती आहे.