प्रतिनिधी / सातारा :
कोरेगाव तालुक्यातील अल्पवयीन युवकावर 376 चा गुन्हा दाखल झाल्याने त्याला बालसुधारगृहात ठेवले होते. मात्र, त्याने बालसुधारगृहातच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. त्याच्यावरील व त्याच्या पित्यावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सरकारच्या विरोधात दलित पँथरचे विश्वास मोरे यांच्या नेतृत्वाखाली पारधी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालय ते पोलीस अधीक्षक कार्यालय असा प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा बेत आखला होता. तो पोलिसांनी हाणून पाडत आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच रोखून धरले.
अल्पवयीन युवकावर 376 चा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. परंतु तेथेच त्याने दोरखंड तयार करुन गळफास लावून आत्महत्या केली. त्यावरुन त्याच्या नातेवाईकांनी खोटा गुन्हा दाखल करुन आत्महत्येस प्रवृत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी तसाही गुन्हा दाखल केला. आता दलित पँथरचे विश्वास मोरे यांनी त्या अल्पवयीन युवकाची व त्याच्या पित्याची त्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात यावी, या मागणीसाठी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचे नियोजन केले. मात्र, याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पारधी समाजातील महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना रोखले.