कर्नाटकात कोरोना महामारीचा फैलाव झपाटय़ाने वाढतो आहे. दुसरी लाट नुकसानकारक व तितकीच भयानक असणार, असा इशारा तज्ञांनी जानेवारीतच दिला होता. तरीही एक लोकसभा व दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका घेण्यात आल्या. निवडणुकीच्या काळात तर कोरोना महामारी नाहीच, या थाटात राजकीय नेते, कार्यकर्ते वावरले. आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सरकारचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. राजधानी बेंगळूरमध्ये तर रोज 250 ते 300 जण दगावत आहेत. 20 ते 25 हजारच्या घरात नवे रुग्ण येत आहेत. राज्यातील रोजची रुग्णसंख्या 50 हजाराच्या घरात पोहोचली आहे. यावरून कर्नाटकात परिस्थिती काय आहे, हे लक्षात येते. म्हणून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील काही जिल्हाधिकाऱयांशी थेट चर्चा केली. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तेथील प्रशासनानेच कोरोना थोपविण्यासाठी कडक निर्णय घ्यावेत, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे.
बेंगळूरला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची वानवा आहे. म्हणून बेंगळूरमधील रुग्ण वेगवेगळय़ा जिल्हा केंद्रांवर उपचारासाठी जात आहेत. सरकारी यंत्रणेबरोबरच खासगी इस्पितळेही कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. मात्र, त्यांची भरमसाट बिले सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नाहीत. एक्स-रे, सिटीस्कॅनसाठी सरकारने दर ठरविले तरी सर्वसामान्य नागरिकांची लूट थांबता थांबेना. काही जणांसाठी ही वेळ सेवा करण्याची तर आणखी काही जणांसाठी गल्ला भरण्याची आहे. दोन्ही अनुभव सर्वसामान्यांना पहायला मिळत आहेत. सरकारी यंत्रणा नेहमी खोटे दावे करण्यात गुंतली आहे. आमच्याकडे औषधांचा भरपूर साठा आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची व्यवस्थाही आहे, अशा वल्गना केल्या जात आहेत. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱया लाटेत नागरिकांना ऑक्सिजनची गरज अधिक भासू लागली आहे. त्यामुळेच मोठय़ा प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. परिस्थिती हाताळण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. तरीही या अपयशावर पांघरुण घालत सर्व काही आलबेल असल्याचा आव आणला जात आहे.
बेळगावसारख्या जिल्हा केंद्रावर मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृतांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशाने अपुरी पडू लागली आहेत. लाकडांची कमतरता भासू लागली आहे. सध्या ही परिस्थिती लक्षात घेऊन 24 मे पर्यंत कर्नाटकात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. पुन्हा एक आठवडा ते पंधरा दिवस लॉकडाऊन वाढविण्याचा विचार आहे. कोरोनामुळे डॉक्टर, पत्रकार, पोलीस, शिक्षक, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या दगावत चालल्या आहेत. दुसरी लाट हाताळता हाताळता सरकारची दमछाक होऊ लागली आहे. त्यातच आता तिसरी लाट येणार आणि लहान मुलांसाठी ती धोकादायक असणार, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. दुसऱया लाटेशी सामना करतानाच येऊ घातलेली तिसरी लाट थोपविण्यासाठी तयारी करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. यातच ब्लॅक फंगसच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. यावर उपचारासाठी आवश्यक असणाऱया लसींचा तुटवडा भासत आहे. एकीकडे ब्लॅक फंगसवर मोफत उपचार करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी यासाठी आवश्यक औषधेच मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. दुसऱया लाटेने कष्टकरी, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांना पुरते हैराण केले आहे. या धक्क्मयातून सावरण्यासाठी वेळ मिळण्याआधीच तिसऱया लाटेची भीती सतावते आहे. कर्नाटकात बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. आता ही संख्या घटत जाईल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी कोरोना परिस्थिती हाताळण्यातही राजकारण केले जात आहे. कोरोना रुग्णावर उपचार करणाऱया इस्पितळांना ऑक्सिजन पुरवठा करण्यातही दुजाभाव केला जात आहे. यावरून सरकारला नेमके काय साधायचे आहे? परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे आहे की नागरिकांना त्यांच्या नशिबावर सोडायचे आहे हेच कळेनासे झाले आहे.
गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वतःच्या घरात कोव्हिड सेंटर उभारून एक आदर्श निर्माण केला आहे. घराचे बांधकाम करताना विजापूर ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी आपल्या घरी आले होते, त्यांनी ‘घर खूप मोठे झाले आहे. एक दिवस ते उपयोगी पडेल’, असे स्वामीजींनी सांगितले होते. कोरोना रुग्णावर उपचारासाठी जागा अपुरी पडू लागली आहे म्हणून आपण आपल्या घरातच 50 बेडची व्यवस्था केली आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. येथे मोफत उपचार केले जात आहेत. रुग्णांना जेवणखाणही मोफत दिले जात आहे. एकीकडे रुग्णांवर उपचारासाठी स्वतःचे घर देऊन एक आदर्श निर्माण करणारे राजकीय नेतेही आहेत तर दुसरीकडे बिकट परिस्थितीतही जनसेवेचा वारसा न जपता राजकारण करणाऱया नेत्यांची काही कमतरता नाही. कर्नाटकात सध्या पारनेर (अहमदनगर) चे आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोव्हिड सेंटरची चर्चा आहे. असा आदर्श प्रत्येक जिल्हय़ात एका नेत्याने तरी घालून दिला असता तर सर्वसामान्य नागरिकांना मरणाच्या दाढेतून वाचवता आले असते. येथे परिस्थिती वेगळीच आहे. अशा परिस्थितीतही राजकारण करणाऱया नेत्यांना भविष्यात त्याचे फळ भोगावे लागणार आहे. आपल्या पुतण्याच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी स्वतःच्या खर्चातून 50 बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे अथणी परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. कोप्पळ गवीमठाच्या स्वामीजींनी तर आपल्या मठाच्या आवारात 200 बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू केले आहे. औषधोपचार व जेवणखाण मोफत पुरविले जात आहे. बेळगावसह राज्यात अनेक सेवाभावी संस्था कोरोनाशी दोन हात करण्यात आघाडीवर आहेत. त्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याऐवजी अशा संस्थांची कोंडी करण्यातच राजकीय नेते व प्रशासन धन्यता मानत आहेत. परिस्थितीत बदल झाला नाही तर तिसऱया लाटेचा सामना कसा करणार, सर्वसामान्य व गरीबांना सरकार वाऱयावर सोडणार काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.