काँग्रेसच्या नेट्टा डिसोझा यांचा आरोप : तृणमूल, आप मतांचे विभाजन करण्यासाठी गोव्यात आल्याचा दावा
प्रतिनिधी / पणजी
गुन्हेगारी, भ्रष्टाचाराने गोव्याला पोखरले असून महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. वाढत्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असून सरकार त्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका अखिल भारतीय महिला काँग्रेस कार्यकारी अध्यक्षा नेट्टा डिसोझा यांनी केली आहे. गोव्यातून मोठय़ा प्रमाणात महिला बेपत्ता झाल्या असून त्यांचा शोध लावण्यात सरकारला अपयश आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पणजी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिसोझा यांनी सांगितले की, गोव्यात महिलांना, मुलींना कोणतीही सुरक्षा नाही. गुन्हेगारीचे वाढते प्रमाण व प्रत्येक क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार याला गोमंतकीय जनता कंटाळली आहे. भाजपच्या या राजवटीतून कधी सुटका होणार याची जनता वाट पाहत आहे. आरटीआयतर्फे मिळालेल्या माहितीनुसार, भाजप सरकारच्या काळात दर दिवशी चार महिलांवर गोव्यात अत्याचार होतात. महिलांविरोधातील गुह्यात 400 टक्के वाढ झाल्याचा दावा डिसोझा यांनी केला आहे. गोवा राज्य लैंगिक तस्करीचे केंद्र बनल्याचा आरोपही त्यांनी केला.
तृणमूल आणि आप हे दोन्ही पक्ष फक्त मतांचे विभाजन करण्यासाठी आले असून नंतर ते पक्ष गायब होणार आहे. तृणमूल पक्ष म्हणजे भाजपची बी टीम असून ती भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी मदत करण्या करीता निवडणूक रिंगणात उतरणार आहे. दिल्लीतील आप सरकारवर तेथील जनता खूष नाही. आप जनतेचे हित जपण्यास अपयशी ठरली आहे. तो पक्ष बदलासाठी आल्याचा दावा गोव्यात करतोय पण त्या पक्षाने दिल्लीत काय बदल केलेत ते सर्वांना माहित आहे. महिलांना उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील, अशी माहिती डिसोझा यांनी दिली.