मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे पत्रकारांना आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा श्रमिक पत्रकार संघटना (गूज) तर्फे आयोजित पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पणजीतील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात शनिवारी आयोजित या सोहळ्यास त्यांच्या सोबत माहिती खात्याचे संचालक दीपक बांदेकर, गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक व सरचिटणीस वासुदेव पागी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी, पत्रकारांनी टीकात्मक जरूर असावे. बिनधास्त टीका करावी. जोपर्यंत आम्ही समाजातील किंवा राजकारणातील चुका दाखवून देत नाहीत, तोपर्यंत त्या चुका सुधारल्या जात नाहीत. अनेक चुका या पत्रकारितेतील स्तंभातूनच दाखविल्या जाऊ शकतात आणि पत्रकारांनी त्या दाखवाव्या. त्यातून आपण स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा सदोदित प्रयत्न करत असतो व यापुढेही करत राहणार, असे मत व्यक्त केले.
गत अडीच वर्षात मुख्यमंत्रीपदी असताना कोणतीही टीका नाकारलेली नाही. त्यासाठी प्रसंगी एखादे पाऊल मागे घेणे भाग पडले तरीही त्यात कमीपणा मानलेला नाही. समाज आणि राज्याच्या दृष्टीने सदरची चूक सुधारणा किंवा दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले आहेत, असेही ते म्हणाले. गोवा स्वयंपूर्ण करणे हे आपले स्वप्न असून त्यात निश्चित यश येईल, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर पत्रकारांसाठी लॅपटॉप आणि पॅमेरा योजना पुन्हा सुरू करणार तसेच पत्रकारांच्या पेन्शनमध्येही वाढ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
या सोहळ्यात त्यांच्याहस्ते 2018, 2019 आणि 2020 या तीन वर्षांतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पर्यावरण, शोध, ग्रामीण, कला आणि संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी, लेआऊट, टीव्ही/डिजीटल, छायाचित्र, कार्टून, व्हिडिओ, आदी प्रकारातील विजेत्या पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजतिलक नाईक यांनी स्वागत केले. प्रज्ञा राणे यांनी सुत्रसंचालन तर वासुदेव पागी यांनी आभारप्रदर्शन केले.