सामाजिक परिवर्तन आंदोलनाच्या राज्य उपाध्यक्षा शोभा गस्ती यांची मागणी
वार्ताहर / चिकोडी
कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारने राज्यातील सर्व अंगणवाडी, बालवाडी व शाळा बंद करण्यात आल्याने शासनाकडून पुरविण्यात येणाऱया पौष्टिक आहार, मध्यान्ह आहार, दूध वितरण, अंडी वितरण आदी योजनांपासून अनेक मुले, गर्भवती महिला वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे कुपोशितांच्या आकडेवारीत गेल्या सहा-सात महिन्यात वाढ झाल्याची टीका सामाजिक परिवर्तन आंदोलनाच्या राज्य उपाध्यक्ष शोभा गस्ती यांनी केली. सरकारने त्वरित एसओपी तयार करून अंगणवाडी, बालवाडी, शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
चिकोडीतील सरकारी विश्रामगृहात पत्रकारांशी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, महिला व बालकल्याण खात्यातर्फे गर्भवती व बालकांमधील कुपोषितपणा नष्ट व्हावा यासाठी पौष्टिक आहार धान्याचे वाटप करण्यात येते. धान्य वाटपाची जबाबदारी अंगणवाडी व बालवाडींवर सोपविण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे अंगणवाडी, बालवाडी व शाळा बंद असल्याने सदर योजना अडकली आहे. सरकारने विद्यागम योजनाही बंद ठेवली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील बालकांमध्ये कुपोशन वाढत आहे. गरीब व रोजंदारीवर अवलंबून असलेल्या गरीब कुटुंबासमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
यासाठी सरकारने याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. गरीब कुटुंबातील बालक, गर्भवतींची आरोग्य तपासणी करण्यात यावी, मध्यान्ह आहार योजना सुरू करावी, दिव्यांगांना ओळखपत्र देण्यात यावे, बालविवाह टाळावेत, शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
आंदोलन करण्याचा इशारा
मंजूळा हरिजन म्हणाल्या, कोरोनापासून बचावासाठी विद्यार्थ्यांना शाळेत पटसंख्येच्या आधारे आळीपाळीने बोलवून त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. गर्भवती व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक योजना लवकरात लवकर पुन्हा राबवण्यास सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी कल्लाप्पा मांग, यल्लाप्पा मादर आदी उपस्थित होते.