नुकसान भरपाईची रक्कम अगदीच नगन्य, प्रती कोंबडी मिळाले 20 रुपये
प्रतिनिधी/ सातारा
सध्या ‘बर्ड फ्लू’ ने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक मोठय़ा अडचणीत सापडले आहेत. याकरीता शासनाने नुकतीच नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यामध्ये मरिआईचीवाडी (ता. खंडाळा) येथे नुकसान झालेल्या व्यवसायिकांना नुकतीच नुकसान भरपाई देण्यात आली आहे. एकुण 21 जणांच्या खात्यावर एकुण 47,502 रू जमा करण्यात आले आहेत. वास्तविक नुकसान भरपाई खूपच कमी असल्याची भावना कुकुटपालकांनी व्यक्त केली आहे.
बर्ल्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेल्या कोंबडय़ा व इतर पक्षी, अंडी आणि पक्षिखाद्याची नुकसानभरपाई देण्यासाठी व रोग नियंत्रणाच्या मोहिमेअंतर्गत 130 लाख रूपये मंजूर केले आहेत. यासंबंधीची घोषणा नुकतीच पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जाहीर केली. व्यावसायिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही नुकसान भरपाई देण्यात येत आहे.
शासनाने सध्या जाहीर केलाला दर हा पक्षी उत्पादन खर्चा पेक्षा कमी आहे. या जाहीर केलेल्या दरातुन उत्पादन खर्च ही निघत नाही. मागील वर्षी देखिल अशाच प्रकारे पक्षांमुळे कोरोनाची लागण होते अशी अफवा पसरली होती, त्यावेळी देखिल बहुसंख्य पोल्ट्री व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसला होता. काहींनी कर्ज काढुन पोल्ट्री उभी केली आहे. आता पुन्हा एकदा ‘बर्ड फ्लू’चे संकट आल्याने हे व्यवसायीक पुर्णतः अडचणीत आले आहेत.
शासनाने जाहीर केलेला दर
यामध्ये आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे प्रतीपक्षी प्रमाणे 20 रूपये, आठ आठवडय़ांच्यावरील अंडी देणारे प्रतीपक्षी 90 रूपये, सहा आठवडे वयापर्यंतच्या मांसल कोंबडय़ा 20 रूपये प्रतिपक्षी, सहा आठवडय़ावरील मांसल प्रतीकोंबडी 70 रूपये, तसेच कोंबडय़ांचे अंडी 3 रूपये प्रतीअंडे, कुक्कुट पक्षी खाद्य प्रती किलो 12 रूपये याचबरोबर सहा आठवडे वयापर्यंतचे बदक 35 रूपये, सहा आठवडय़ावरील बदक 135 ऱपये प्रतिपक्षी नुकसान भरपाई देण्यात येत आहे. ही नुकसान भरपाई बाधित क्षेत्रातील एक किलोमीटर परिघातील पक्षी ‘बर्ड फ्लू’ नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जाणीवपूर्वक नष्ट केलेल्यांना देण्यात येणार आहे.
नुकसान भरपाईत खर्चच निघत नाही
शासनाने सध्या जाहीर केलेल्या नुकसान भरपाईत उत्पादन खर्चच निघत नाही. त्यामुळे या जाहीर केलेल्या निधीचा पुन्हा एकदा विचार शासनाने करावा. त्याचबरोबर मागील वर्ष हे लॉकडाऊन मध्येचे गेले त्यामुळे आत्ता तरी व्यवसायाला चांगले दिवस येतील अशी अशा होती, पण आत्ता देखिल ‘बर्ड फ्लू’ ची अफवा पसरली आहे.