भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांची टिका
प्रतिनिधी / लातूर
मराठा समाजासोबतच ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसीचे आरक्षण असल्याने या समाजाला राजकीय लाभ मिळत होता. परंतू ठाकरे सरकारने मराठा समाजासोबतच ओबीसीचे आरक्षण रद्द केल्याने येत्या 26 जून रोजी सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने राज्यातील 36 जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हा शहराध्यक्ष गुरूनाथ मगे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, प्रदेशप्रवक्ते गणेश हाके, आदिंसह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. आरक्षणाचा हा महत्वाचा व न्याय देणारा विषय विद्यमान सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू न मांडल्याने मराठा समाजाचा विश्वासघात झाला. त्यासोबतच ओबीसी समाजाचेही आरक्षण संपुष्टात आले. न्यायमुर्ती के. मुर्ती यांनी सरकारला आरक्षणासाठी आयोग नेमावा अशा सुचना केल्या होत्या. परंतू पंधरा महिन्याचा वेळ असतांना या सरकारने कोणतेही काम केले नाही. उलट सामाजिक न्यायमंत्री विजय वडेट्टिवार हे आरक्षणाच्या विरोधात मोर्चा काढत राहिले परंतू त्यांना आरक्षणाबाबत बाजु मांडता आली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
लातूर जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधीसह ओबीसी मोर्चाच्या पदाधिकार्यांची बैठक लातूर येथे आयोजित करण्यात आली होती. आरक्षण हा समाजाचा नव्हे तर जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. छत्रपती शाहू महाराजांनी या ओबीसी समाजाला पुढे येण्यासाठी आरक्षण देवून सन्मान केला. परंतू ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात राज्य शासनाने दुर्लक्षीत केल्यामुळेच रद्द झाले आहे. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळू नये अशी या सरकारची भुमिका आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेवू नये अशी मागणी यावेळी त्यांनी केली.