पाच पालिका निवडणूक प्रकरणी सरकारच जबाबदार
प्रतिनिधी/ पणजी
पाच पालिका क्षेत्रातील निवडणूक सरकारच्या अट्टाहासामुळे रद्द झाली. यामुळे गोमंतकीयांचे सर्वत्र हसे झाले. याला भाजप सरकार जबाबदार आहे. कायद्येतज्ञांनी उच्च न्यायालयाचे निर्देश पाळण्याचा सल्ला देऊनसुद्धा या सरकारने सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या याचिकेला आव्हान दिले आणि गोमंतकीयांचे नाक कापून घेतले. याशिवाय नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयुक्त हे स्वतंत्र व्यक्तीकडेच असावे, असा निकाल देऊन सरकारला बऱयापैकी चपराक दिली आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी ऍड. जितेंद्र गावकर, कामगार नेते जॉन नाझारेथ उपस्थित होते.
2012 ते 2017मधील निवडणुकीमध्ये 19वरून 27 टक्के आरक्षण घेतले होते. तेच आता 20 ते 22 टक्क्यांवर आणले आहे. तसेच थिवी मतदारसंघातील कोलवाळ प्रभाग क्र. 5मधून मतदारांनी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत मतदान केले. परंतु आता त्यांना पालिका निवडणुकीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. निवडणूक आयुक्ताने याकडे त्वरित लक्ष द्यावे. म्हापसा प्रभाग क्र. 3 आणि कोलवाळ प्रभाग क्र. 5मध्ये जो निवडणूक आयोगाने घोळ केला आहे, त्यात लवकरात लवकर लक्ष घालावे. अन्यथा यासाठी मला न्यायालयात जावे लागेल, असा इशारा कांदोळकर यांनी यावेळी दिला. सध्याचे सरकार अधिकाऱयांवर हुकुमशाही चालवित असून पोलिस व सरकारी अधिकाऱयांनी विचार करून वागणे गरजेचे आहे, असे कांदोळकर यांनी पुढे सांगितले.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी नुकतेच एक विधान केले की, मुख्यमंत्री बहुजन समाजाचा कैवारी आहे. परंतु मुख्यमंत्री कैवारी नसून रिंगमास्टर आहे. निवडणुकीच्या आरक्षणात मागासवर्गीय व महिला आरक्षणात जो अन्याय केला आहे. त्यावर उच्चवर्णीय लोकच पुढे आले आहेत. सरकारने समाजाचे भान ठेवून न्याय करावा, असे किरण कांदोळकर यांनी सांगितले.
निवडणूक आयुक्त सरकारच्या हातातली कठपुतली
निवडणूक आयुक्त सरकारच्या हातातली कठपुतली आहे. सरकारला रात्रीच्या गोष्टी करण्याची सवय असल्याने निवडणूक प्रक्रियाही रात्रीच्या वेळेत निर्णय घेऊन तोडगा काढावा, असे कांदोळकर यांनी सांगितले. केपेतून बिनविरोध येणे म्हणजे एक लज्जास्पद गोष्ट आहे. काँग्रेसकडे तीन जागांसाठी विरोधी उमेदवार ठेवण्यासाठी नाहीत. ही दयनीय अवस्था आहे. विरोधी उमेदवार जर उभे करायला मिळत नाहीत तर कसले हे विरोधी पक्ष. काँग्रेस ही आताची नव्हे तर 2027 ची समाप्तीची तयारी करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झालेला आहे. त्यावर सभापती राजेश पाटणेकर यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय लवकर आणि योग्य द्यावा. सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे, असे कांदोळकर यांनी सांगितले.
म्हापसा पालिका निवडणुकीत भाजपाला घरी बसविण्याची योजना केली जात आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाकडे 30 जागा लढविण्याची क्षमता आहे. युतीच्या गोष्टींसाठी थांबलो आहोत. गोमंतकीयांच्या भावना जपून भाजपला घरी बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे किरण कांदोळकर यांनी सांगितले.