कोविड हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर व्यवस्थित चालविण्यात यावे, यासाठीसुद्धा पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आता कोविड हॉस्पिटल सर्व सुविधांनी सुसज्ज होत आहे. हेच सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण होय.
गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार याची पूर्ण कल्पना राज्य सरकारला होती. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अगोदर लॉकडाऊन पाळण्यात आला. याचवेळी कोरोनाचे रुग्ण ठेवण्यासाठी खास हॉस्पिटलची निर्मिती व्हायला पाहिजे होती पण सरकारने तसे नियोजनच उशिरा केले. दक्षिण गोव्यातील ईएसआय हॉस्पिटल एका रात्रीत कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत केले पण हे हॉस्पिटल सर्व सुविधांनी सुसज्ज करण्यात आले नाही. विविध आजारांवर उपचार करणारे डॉक्टरही उपलब्ध करण्यात आले नाहीत. परिणामी गोव्यात कोरोनाचा संसर्ग झालेले, इतर आजार असलेल्या व्यक्तींचे धडाधड बळी जाऊ लागले आणि साठ जणांचे बळी गेल्यानंतरच सरकारने गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर कोविड हॉस्पिटलमध्ये उलपब्ध करण्याचा निर्णय घेतला.
कोविड हॉस्पिटलची निर्मिती केल्यानंतर सुरुवातीला ‘गोमेकॉ’चे मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. एडविन गोम्स यांची कोविड हॉस्पिटलमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासोबत गोमेकॉतील चार ज्युनियर डॉक्टरही होते. गोव्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तो मांगोरहिल-वास्को येथील एक मासळी विक्रेता. या मासळी विक्रेत्याची पत्नी, त्याचे दोन मुलगे व सून हे सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यात मासळी विक्रेता व त्याची पत्नी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सुरुवातीला गोमेकॉत नेण्यात आले. त्या ठिकाणी, कोरोनाचे निदान करण्यासाठी त्याची चाचणी घेतली असता, ते पॉझिटिव्ह आढळून आले. नंतर त्यांना मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. दुसऱयाच दिवशी त्याचे दोन्ही मुलगे व गरोदर असलेली सूनदेखील पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
मासळी विक्रेत्यासहीत त्याची पत्नी, दोन्ही मुलगे व सून यांच्यावर कोविड हॉस्पिटलात उपचार सुरू झाले. त्यानंतर मांगोरहिल भागातून दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले. त्यात चिखली हॉस्पिटलचे काही कर्मचारी मांगोरहिल भागात डेंग्यू व मलेरियाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. तेही पॉझिटिव्ह आढळून आले. मांगोरहिल-भागातून कोरोनाचा फैलाव राज्यभर झाला.
जून महिन्यात कोरोनाचा पहिला बळी गेला, तो केरी-सत्तरी येथील एका वयस्क व्यक्तीचा. या व्यक्तीला अन्य आजारही होते मात्र कोविड हॉस्पिटलात कोरोना सोडल्यास अन्य आजारांवर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर नव्हते. ‘को-मॉर्बिडिटी’ म्हणजेच मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड, कॅन्सर यासारखे अन्य आजार असलेले रुग्ण तसेच वयस्क व्यक्ती कोरोनाचा मुकाबला करू शकत नसल्याचे आजवरच्या बळींवरून स्पष्ट झाले आहे.
गोव्यात को-मॉर्बिडिटीमुळे रुग्ण दगावतात असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कोरोनामुळे पन्नास बळी गेले तरी सरकार संवेदनशील असल्याचे कुठेच आढळून आले नाही. त्याचबरोबर को-मॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारने कोणतीच उपाययोजनाही आखली नव्हती. अन्य आजारामुळेच रुग्ण दगावत असल्याचे चित्र उभे करण्यात आले होते. सरकारच्या अधिकृत पत्रकार परिषदांमधून देखील को-मॉर्बिडिटीमुळेच कोरोनाचे रुग्ण दगावल्याचे सांगितले जात होते.
राज्यपालांनी केली कानउघाडणी
आज वयाची चाळीशी पूर्ण केल्यावर अनेकांना इतर आजारांचा सामना करावा लागतो. त्यात मधुमेह, रक्तदाब, किडणीचा आजार, हृदयविकार इत्यादी आजारांवर औषधे घ्यावी लागतात. वेळच्यावेळी औषधे घेऊन सहज पुढची पंधरा ते वीस वर्षे जीवन जगतात मात्र आता कोरोनामुळे त्यांचा बळी जाऊ लागला. याची गंभीर नोंद अखेर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी घेतली. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, आरोग्य खात्याचे अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत कोविड हॉस्पिटलमध्ये को-मॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्वरित तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचा आदेशही दिला. को-मॉर्बिडिटीमुळे मृत्यू येतो, असे सांगून आपण जबाबदारी टाळू शकत नसल्याचे राज्यपाल म्हणाले होते. त्यानंतर सरकारवर सर्व स्तरातून जोरदार टीका झाली होती.
राज्यपालांनी कानउघाडणी केल्यानंतर तसेच साठ बळींची नोंद झाल्यानंतर सरकारने कोविड हॉस्पिटलमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यात कोविड हॉस्पिटलचा ताबा ‘गोमेकॉ’कडे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कोविड हॉस्पिटलचा कारभार हाताळणाऱया हॉस्पिसियो इस्पितळाच्या अधीक्षक डॉ. आयरा आल्मेदा यांची उचलबांगडी केली व त्यांच्या जागी ‘गोमेकॉ’चे डीन डॉ. एस. एम. बांदेकर यांची नियुक्ती केली. कोविड हॉस्पिटलात आता मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, कॅन्सर, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोसर्जरी, मूत्रविकार हे विभाग सुरू केले जाणार आहेत. त्यात ‘गोमेकॉ’चे तज्ञ डॉक्टर रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.
डॉ. आयरा आल्मेदा यांनी सरकारपर्यंत अनेक आवश्यक गोष्टींची माहितीच पुरविली नाही. परिणामी सरकार गाफिल राहिले काय असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. त्यात डॉ. आल्मेदा यांच्या वर्तनाबद्दलही येथील कर्मचाऱयात तीव्र नाराजी होती. शेवटी त्यांची उचलबांगडी झाली.
कोविड हॉस्पिटल सुरळीत व्हावे, यासाठी डॉ. बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जोस डिसा व ईएसआय हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. विश्वजित फळदेसाई यांचा समावेश आहे. ही समिती डॉक्टर, नर्सेस व पॅरामेडिकल कर्मचाऱयांसंदर्भात निर्णय घेणार आहे. कोविड हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर व्यवस्थित चालविण्यात यावे, यासाठीसुद्धा पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आता कोविड हॉस्पिटल सर्व सुविधांनी सुसज्ज होत आहे. हेच सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण होय.
महेश कोनेकर