भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
विद्यमान भाजप सरकार केवळ विकासाच्या ध्यासातून कार्यरत आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. भविष्यात भाजपच्या नेतृत्वाखाली गोव्याला एका नवीन उंचीवर पोहोचविण्याचे व प्रत्येकाच्या स्वप्नपूर्तीचे ध्येय आहे, असे ते पुढे म्हणाले.
मतदार सूचना पेटी असलेल्या संकल्प रथ वाहनांचे उद्घाटन करण्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार विनय तेंडुलकर, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, दीपक पाऊसकर, जेनिफर मोन्सेरात, नीलेश काब्राल, यांच्यासह जाहिरनामा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
’दहा वर्षे विकासाची, पाच वर्षे समृद्धीची’
’दहा वर्षे विकासाची, पाच वर्षे समृद्धीची’ असे नाव देण्यात आलेल्या रिपोर्ट कार्डचे यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. गोवा आणि गोमंतकीयांसाठी गत दहा वर्षात सरकारने केलेल्या कार्याचा संपूर्ण लेखाजोखा या पुस्तिकेतून मांडण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्याशिवाय ’संकल्प पत्र’ या वेबसाईटचेही अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी गोव्यातील विकासावर आधारित व्हिडिओ दाखविण्यात आला.
सेवा करण्याचे काम अटलजी, मोदीजीनी केले
पुढे बोलताना श्री. नड्डा यानी, लोकशाहित कार्य संस्कृतीत जो बदल झाला आहे त्यामागे प्रधानमंत्र्यांच्या कार्यशैलीचा प्रभाव आहे, असे सांगितले. यापूर्वीची ’राजकीय संस्कृती’ म्हणजे, केवळ व्होट बँकेचे राजकारण करून केवळ स्वतःचे घर भरणे, भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करून कुटुंबाचा-सग्यासोयऱयांचा विकास करणे व त्यायोगे पुढील निवडणुकीची तयारी करणे, अशी होती. मोदींनी त्यात पूर्ण बदल केला. त्यांनी लोकहिताचा विचार केला, त्यांच्या सुखदुःखांची चिंता केली, चर्चा केली. थोडक्यात सांगायचे झाल्यास गत सरकारांनी केवळ मेवा खाल्ला, सेवा करण्याचे काम अटलजी आणि मोदीजींनी केले, असे ते म्हणाले.
गोव्याची तृतीय क्रमांकावर झेप ः सावंत
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलताना, गोवा राज्याच्या एकुण अर्थसंकल्पापेक्षाही जास्त निधी केंद्राकडून मदतरुपात गोव्याला प्राप्त झाला असून त्याद्वारे अनेक साधनसुविधा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. अन्य कित्येक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, तर पुढील काळात आणखी 8 ते 10 प्रकल्प केंद्राकडून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती दिली. या सर्व कामगिरीमुळे केंद्र सरकारने निधीच्या योग्य वापरासाठी (96टक्के) गोव्याची प्रशंसा केली असून त्याद्वारे गोव्याने सातव्या क्रमांकावरून तृतीय क्रमांकावर झेप घेतली आहे, असे ते पुढे म्हणाले.
भाजपची विकासगती प्रशंसनीय ः श्रीपाद
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी बोलताना, भाजपच्या गत दहा वर्षातील कार्याचा आढावा घेतला. विकास ही एक निरंतर प्रक्रिया. ती थांबू शकत नाही. त्याही परिस्थितीत भाजपने केलेला विकास हा खरोखरच प्रशंसनीय आहे, यात दुमत नाही. हे कार्य पाहता पुढील पाच वर्षांसाठीही गोव्यातील जनता भाजपलाच संधी देतील, असे ते म्हणाले.
भाजपने जे सांगितले ते पूर्ण करून दाखविले ः तानावडे
भाजपने आतापर्यंत जे सांगितले ते पूर्ण करून दाखविले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या विकासाचे जे नियोजन केले होते ते पुढे नेण्याचे प्रयत्न नंतरच्या सरकारकडून झाले आहेत व होत आहेत, असे सदानंद तानावडे यांनी सांगितले. समाजाच्या प्रत्येक घटकाची गरज ओळखून भाजपनेच दयानंद सामाजिक सुरक्षा, लाडली लक्ष्मी, गृहआधार यासारख्या योजना लोकांना दिल्या. या सर्व योजना खऱया अर्थाने लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. आता पुढील पाच वर्षांसाठी लोकांना काय हवे ते त्यांच्याकडून ऐकण्यासाठीच ही सूचना पेटी संकल्पना राबविण्यात येत आहे, असे तानावडे पुढे म्हणाले.
जाहिरनामा समितीचे समन्वयक लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बोलताना, महिला, शेतकरी, मच्छिमार, वैद्यक, अभियंते, यासारख्या समाजातील प्रत्येक घटकांकडे जाऊन चर्चा करण्यात येणार असून त्यांच्याकडून सूचना मागविल्या जातील. त्यानुसार जाहिरनामा तयार करण्यात येईल. त्यामुळे हा जाहिरनामा भाजपचा असला तरी प्रत्यक्षात तो जनतेचा जाहिरनामा असेल, असे सांगितले.