प्रतिनिधी / फोंडा
‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात जी आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशावेळी आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा जनतेसाठी काम करणे आवश्यक आहे. मंत्रीमंडळाच्या संख्येत कपात करून लोकप्रतिनिधी निष्क्रीय आहेत असे सुचवून सरकारमध्ये अस्थिरता आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, असा आरोप फोंडा भाजपा मंडळाने केला आहे.
फोंडा भाजपाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी सुदिन ढवळीकरांच्या सल्ल्यांची सरकारला गरज नसल्याचे सांगत त्यांच्या या विधानाचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्यवेळी योग्य पावले उचलल्याने आज भारतावर कोसळलेले कोरोनाचे संकट मर्यादेत आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही योग्य निर्णय घेतल्याने व जनतेने त्याला सहकार्य केल्याने गोव्यात कोरोनाचा फैलाव पहिल्या पातळीवरच थोपविता आला. कोरोनाच्या या लढाईत सरकारची कार्यक्षमता तसेच डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस व या आपत्तकालीन स्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाऱया सर्वांचे फोंडा भाजपाने अभिनंदन केले.
फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शांताराम कोलवेकर बोलत होते. यावेळी भाजपाचे पदाधिकारी संदीप खांडेपारकर, फोंडय़ाचे उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, शुभम नार्वेकर, महेश देसाई, दिगंबर जल्मी व संतोषी शिवपुरी हे उपस्थित होते. सन 2012 मध्ये मगो भाजपा युती सरकार स्थापन झाल्यानंतर सुदिन ढवळीकरांनी मगोच्या वाटय़ाला आलेली दोन मंत्रिपदे आपल्या कुटुंबातच का ठेवली ? मगोचे तिसरे आमदार लवू मामलेदार यांना एक मंत्रिपद न देता आपल्या भावाला दिले. शिरोडा पोटनिडणुकीतही तेथील स्थानिक उमेदवाराला वगळून बंधू दीपक ढवळीकरांना उमेदवारी दिली. यातून त्यांचा राजकीय स्वार्थ लक्षात येतो, अशी टीकाही श्री. कोलवेकर यांनी केली. कोरोना महामारी संक्रमण काळात सर्वांनी पक्षविरहित व राजकीय हेवेदावे विसरून जनतेसाठी काम करण्याची गरज आहे. अशावेळी सरकारमध्ये कलुषित वातावरण निर्माण करून दुफळी निर्माण करणारी आमदार ढवळीकरांची विधाने निषेधार्ह असल्याचे संदीप खांडेपारकर म्हणाले.