गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा आरोप : जि. पं. निवडणुकीसाठी भाजपकडून दोन महिन्यांपासून तयारी
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही असताना पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीचे मतदान घेण्याची जी घोषणा केली आहे त्यामुळे तमाम गोवेकर अचंबित झाले असले, तरी गोवा फॉरवर्डला आश्चर्य वाटलेले नाही. ही निवडणूक घेण्यासाठी भाजपने मागचे दोन महिने पद्धतशीरपणे तयारी चालू ठेवली होती, असा आरोप पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. गोवा सरकारला राज्याच्या सामाजिक आरोग्यापेक्षा आपले राजकीय आरोग्य जास्त महत्त्वाचे वाटते, असा आरोप त्यांनी केला आहे.
राज्य सरकारला कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक घ्यायची आहे हे आम्ही मागचे दोन महिने सांगत आलो आहोत. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे ते म्हणाले. जून व जुलै महिन्यांत देशात कोरोनाचा उदेक होऊ शकतो असा इशारा ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे याची आठवण करून देऊन सरदेसाई यांनी, सरकार गोव्यात याच काळात मतदान घेऊन लोकांच्या जिवाशी खेळू पाहत आहे, असा आरोप केला आहे.
निवडणुकीवर डोळा ठेवून पावले
ही निवडणूक घेण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्याकरिता मागचे दोन महिने सरकार सुरक्षेच्या उपायांच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवत होते. लॉकडाऊनच्या काळात सरकाने लोकांना केलेली मदत निवडणुकीवर डोळा ठेवूनच होती. गोव्यातील 1 टक्का लोकांची तपासणी न करताही राज्य कोरोनामुक्त अशी जी घोषणा केली गेली तिही याचसाठी होती. विदेशात अडकलेल्या खलाशांना आणि अन्य गोमंतकीयांना गोव्यात आणण्याच्या बाबतीत सरकार जी उदासिनता दाखवत होते तेही या निवडणुकीवर डोळा ठेऊन आपल्या कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठीच होते. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने सरकारचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत, असा दावा सरदेसाई यांनी केला आहे.
दहावी परीक्षेचा ट्रेलर म्हणून वापर
आता गोवा हरित विभागात असल्याचा प्रचार करून ही निवडणूक घेण्याचा सरकार शेवटचा प्रयत्न करू पाहत आहे. त्यासाठी दहावीच्या परीक्षेचा टेलर म्हणून सरकार वापर करू पाहत आहे. या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत व्हाव्यात म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे मध्यरात्री शिथील करून घेण्यात आली. या परीक्षा किती महत्त्वाच्या आहेत हे पटवून देण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांचाही वापर करून घेण्यात आला. हे सारे परीक्षा झाल्यानंतर निवडणूक घेता यावी यासाठीच असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.
…तर लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा
दिल्ली, मध्यप्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांत कोरोनाने थैमान माजविलेले असताना रेल्वे सुरू करून गोव्याची दारे या राज्यांतील लोकांना खुली करून देण्यात आली आहेत. सोमवारपासून विमानसेवाही सुरू होणार आहे. या परिस्थितीत गोव्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ही निवडणूक घेणे धोक्मयाचे असून गोवा फॉरवर्ड ते होऊ देणार नाही, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. सरकारने ही निवडणूक घेतलीच, तर लोकांनी त्यावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
खाण व्यावसायिकांसाठी पर्यावरण धोक्यात घालण्याचा प्रयत्नजागतिक जैवविविधता दिनीच गोवा सरकारने राज्यातील पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील गावांची संख्या कमी करण्याची जी मागणी केली आहे तिही दुर्दैवी आहे. खाण व्यावसायिकांना फायदा व्हावा यासाठी सरकार गोव्याचे पर्यावरणही धोक्मयात घालू पाहत आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.