प्रतिनिधी/ पणजी
सरकारची आर्थिक परिस्थिती गंभीर बनली असून कर्ज काढून आणलेला निधी जातो कुठे? असा प्रश्न विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला असून अंमलीपदार्थ, वेश्या व्यवसाय व इतर अनेक विषयावरून अधिवेशनात सरकारला जाब विचारून धारेवर धरण्यात येणार असल्याची माहिती कामत यांनी दिली.
अमलीपदार्थांचा सुळसुळाट आता गोव्यात सर्वत्र झाला असून वेश्या व्यवसायही सर्वत्र फोफावला आहे. त्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून सातत्याने समोर येत असून पर्यटनस्थळ असलेले गोवा राज्य कोणत्या दिशेने जात आहे याचा गंभीरतेने विचार करण्याची वेळ आली आहे. सरकारला याचा आपण जाब विचारणार असल्याचे कामत यांनी नमूद केले.
महसूल वाढीसाठी पर्याय शोधा
गोव्यात विकासकामे कसलीच होत नाहीत. सरकारचे कुठेतरी चुकते आहे. संगीतपार्टीच्या नावाखाली अंमलीपदार्थ मुक्तपणे मिळतात हे समोर आले आहे. कोटय़वधी रुपयांची कर्जे काढली जात असून त्यातून काहीच कामे होत नाही, असे लुईझिन फालेरो यांनी सांगितले. आमदार रवी नाईक म्हणाले की, सरकार कर्जबाजारी झाले असून कर्जे काढणे चालूच आहे. प्रत्येक मतदारसंघात 25 कोटी देणार म्हणून सांगण्यात आले होते, परंतु ना निधी ना विकास ना सुविधा अशी परिस्थिती आहे. सनबर्न बंद करा आणि महसूल वाढीसाठी इतर पर्याय शोधा अशी सूचना नाईक यांनी केली.
सरकारचा सगळा सावळा गोंधळ : राणे
आमदार प्रतापसिंह राणे म्हणाले की, या सरकारमध्ये नेमके काय चालले आहे तेच कळत नाही. खाणबंदीमुळे 40,000 कुटुंबे बेकार झाली असून खाणीची फक्त आश्वासने मिळत आहेत. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. कोणी कुठेही काहीही बांधतात, असा सगळा सावळा गोंधळ चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हादईप्रश्नी विधानसभा अधिवेशनात स्थगन प्रस्ताव मांडणार
म्हादईप्रश्नी काँग्रेस पक्ष आजच्या एक दिवशीय विधानसभा अधिवेशनात स्थगन प्रस्ताव मांडणार असून गोवा फॉरवर्ड, मगो व अपक्ष आमदार त्यास पाठिंबा देणार आहेत. म्हादई पाणी प्रश्न सध्या ऐरणीवर असून गोवा सरकारची तसेच गोमंतकीय जनतेची केंद्राने फसवणूक केल्याची भावना झाली आहे. जनता या प्रकरणी संतापलेली असून कर्नाटकातील म्हादई नदीवरील प्रकल्पांना दिलेला परवाना रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा विधानसभेत करण्यात येणार आहे. म्हादई प्रश्नाचे पडसाद विधानसभा अधिवेशनात उमटणार असून सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन या प्रकरणी सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगण्यात आले.