भारत, राज्य सरकार, पोलीस या नावांच्या पाटय़ा लावून वाहनांचा दुरुपयोग!
सुरेश बापर्डेकर यांची चौकशीची मागणी
प्रतिनिधी / मालवण:
राज्यभरातून येणाऱया पर्यटकांच्या काही गाडय़ांवर भारत सरकार, राज्य सरकार, पोलीस, अन्य लोकप्रतिनिधी या नावांच्या पाटय़ा लावून काही हौशी मंडळी आणि कुटुंबातील सदस्य मौजमजा करण्याकरिता राज्यभर फिरतात. यावर सरकारी यंत्रणेने त्वरित लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात बापर्डेकर म्हणतात, हे पर्यटक सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा राज्य आदी ठिकाणच्या पाटय़ा लावून आपला प्रवास टोलमुक्त करतातच परंतु ते आपली हुशारी व कुठेही गेल्यावर हा फलक पाहिल्यावर त्यांना सरकारी अधिकारी समजून कुठेही रोखले जात नाही. रोखताही येत नाही किंवा त्यांना हवी असलेली सेवा चांगल्या दर्जाची मिळावी हा त्यांचा हेतू असावा.
महाराष्ट्रातील गाडय़ा शासकीय असून त्यांना गाडय़ा घेऊन सरकारी फलक लावून जिकडे-तिकडे फिरायला कोण देतं? या गाडय़ा शासकीय सचिव, अधिकारी, मंत्रीमहोदयांना सरकारी कामाच्या वापराकरिता असताना याचा दुरुपयोग कसा होतो? ही शासकीय पैशांची उधळपट्टी व दुरुपयोग करायला यांना कोणी परवानगी दिली. या प्रत्येक वाहनांची गणना होत नाही काय? नागरिकांना आपल्या किंवा गावाच्या समस्या घेऊन जायचे, तर गेटवरतीच माहिती नमुद करावी लागते मग या शासकीय गाडय़ांची येता-जाता नोंद का केली जात नाही? हे जाणून-बुजून होत आहे. सरकारची गाडी, सरकारच्या पैशाची उधळपट्टी होऊनही सरकारी यंत्रणा गप्प का? या वाहनांची रोज जनगणना होत नाही का? या सरकारी गाडय़ा बाहेर जातातच कशा? यांना कोणी वाली नाही काय? गाडीत सरकारी कामाकरिता सचिव, अधिकारी आहेत, की त्यांच्या कुटुंबातील माणसे अगर अन्य कोणी, याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्या-त्या जिल्हय़ातील पोलीस अधीक्षकांमार्फत सखोल चौकशी करतील काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
अशाप्रकारे सरकारी गाडय़ांची होणारी लूट, इंधनाची उधळपट्टी रोखण्यास शासन पुढाकार घेईल काय? तसेच संबंधित पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश देऊन कारवाई करण्याची मागणी बापर्डेकर यांनी पत्रकातून केली आहे.