शाळा ही समाजाची छोटी आवृत्ती… विद्येचे… ज्ञानाचे मंदिर फुलते ते मुलांमुळेच… कुटुंबानंतर मूल रमते ते शाळेतच… यामुळे शाळेचे वातावरण हे मुक्त, हसतखेळत आणि प्रसन्न असायला हवे. जिव्हाळा, आपुलकी, प्रेम याच्या आधारावर घर उभारते. त्याचप्रमाणे शाळा देखील शिक्षक-विद्यार्थी, शाळेचा परिसर, पालकांचे सहकार्य यावरच उभी राहते. शाळेची इमारत मोठी किंवा लहान आहे, हे महत्वाचे नाही तर त्यामध्ये असणारा आपलेपणा महत्वाचा असतो. नार्वेकर गल्ली शहापूर येथील सरकारी कनि÷ प्राथमिक मुलांची शाळा क्र. 45 ही मूर्ती लहान पण कीर्ती महान याचे उदाहरण आहे.
शहापूर, नार्वेकर गल्ली येथे पंच मंडळांच्या पुढाकारातून 1954 साली गल्लीतील सार्वजनिक कार्यालयात शाळेची स्थापना करण्यात आली. शटुजीराव गुंडोजीराव बिर्जे व शिंदे यांच्या प्रयत्नातून शहाजी विद्यालय नावाने शाळा सुरु करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचे महत्व अधोरेखित करत पंच मंडळीच्या इमारतीत शाळा भरविण्यात येऊ लागली. आजही शाळा त्याच इमारतीत आणि तितक्मयाच उत्साहाने ज्ञानदानाचे कार्य करत आहे. पूर्वी 150 ते 200 विद्यार्थी संख्या असणारी ही शाळा आचार्य गल्लीतील राममंदिरात 3 वर्ग व 2 वर्ग नार्वेकर गल्लीत अशा स्वरुपात भरविली जात होती. छोटीशी शाळा असली तरी प्रगतीच्या आणि विकासाच्या बाबतीत मात्र शाळेने उंच शिखर गाठले. 1980 पर्यत पंच मंडळीच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून शाळा चालविली गेली. पुढे ही शाळा सरकारी शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली.
सुवर्णमहोत्सवी वर्ष उत्साहात साजरे
शाळेची इमारत लहान असली तरी शाळेने पन्नाशी गाठत सुवर्णमहोत्सवी वर्ष 2011 साली साजरे केले. जिव्हाळा व आपुलकीच्या जोरावर शाळेची प्रगती होत गेली. एम. एस. नारळीकर, बी. एन. पवार, आर. एम. पाटील, मंगल पाटील, एस. जी. काकतीकर यांनी शाळेचे मुख्याध्यापकपद भूषवत सर्व शिक्षकांच्या मदतीने शाळेच्या विकासात हातभार लावला. गल्लीतील पंचमंडळी तसेच माजी विद्यार्थी, एस. डी. एम. सीचा हातभार यांच्या पुढकारातूनच शाळेने यशस्वीतेचा टप्पा गाठत सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले. शाळा आता 65 व्या वर्षात वाटचाल करत आहेत.
शाळा आमचे कुटुंब
शाळेची एकच वर्गखोली आहे. त्यातच दोन विभाग करण्यात आले आहेत. यामुळे शाळा विद्यार्थी व शिक्षकांसाठी कुटुंबच आहे. आज इंग्रजीकडे वाढता कल असल्यामुळे शाळेची पटसंख्या घटली आहे. मात्र गल्लीतील पंचमंडळीचे सहकार्य आणि एसडीएमसीचे अध्यक्ष मंगेश मुतगेकर व कमिटीची नेहमी साथ आहे. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून एम.वाय.सांबरेकर कार्यरत असून सहशिक्षिका म्हणून सुजाता रेश्मी सेवा बजावत आहे. माध्यान्ह आहार वितरणाचे कार्य ज्योती बाळेकुंद्री करतात यामुळे शाळेचे वातावरण आणि कार्यप्रणाली कुटुंबासारखीच वाटते.
उपक्रमशील शाळा
‘शाळा म्हणजे नकोत नुसत्या भिंती’ असे म्हटले जाते. यामुळे शाळेने विद्यार्थ्यांची गुणवत्ता जोपासताना नेहमी उपक्रमशील राहण्याचा प्रयत्न केला आहे. छोटीशी शाळा असली तरी स्नेहसंमेलनापासून ते सहलीपर्यंतचे आयोजन तितक्मयाच उत्साहात केले जाते.
राष्ट्रीय सणांना माजी विद्यार्थी, निवृत्त शिक्षकांची हजेरी आणि गल्लीतील पंचकमिटीचा सहभाग मोलाचा ठरतो. यामुळे खाऊ वितरणापासून स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मोठय़ा उत्साहात पार पाडला जातो. तालीम, मंदिर आणि शाळा असा त्रिकोण शाळेच्या इमारतीने सांभाळला आहे.
मुख्याध्यापक मनोहर सांबरेकर
शाळा सर्वांच्या सहकार्यातून उभी आहे. शाळेने आपली गुणवत्ता जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेची इमारत लहान असली तरी कुटुंबाप्रमाणे असणारे वातावरण शाळेच्या विकासाला पोषक आहे. एक सहकारी शिक्षकांच्या मदतीतून शाळा मार्गक्रमण करत आहे. आज इंग्रजीला अवास्तव महत्व दिले जात असल्याने पटसंख्या घटली आहे. मात्र गल्लीतील मंडळी प्रामुख्याने याच शाळेत शिकली असून आजही शाळेत गल्लीतीलच मुले आहेत.
राधिका सांबरेकर