ऑनलाईन टीम
पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान देखील या मुद्द्यावरून मोठा गदारोळ पहायला मिळाला. पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील काही राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन हॅक करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. यावरुनच महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधत असताना सामान्य जनतेला सूचक इशारा दिला आहे.
“सरकार तुमचे व्हॉट्सअॅप चॅट, एसएमएस वाचतंय. तुमचे व्हिडीओ आणि फोटो, इमेल, मेडिकल रेकॉर्ड, पेमेंट हिस्ट्री, संपर्क क्रमांक पाहातंय. पेगॅसस हे फक्त राजकारणी, पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतच मर्यादित नाही. ते तुमच्याबद्दलही आहे. विचार करा”, असं ट्वीट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
इस्त्रायलमधील एनएसओ गटाने तयार केलेल्या पेगॅसस हेरगिरी करुन जगभरातल्या लोकांचे फोन हॅक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामध्ये भारतातील ४० जणांचे फोन हॅक झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचाही समावेश आहे. तर अनेक राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचाही समावेश आहे.