प्रतिनिधी/ पणजी
भाजप सरकारने चालविलेली सरकार तुमच्या दारी ही मोहीम म्हणजे केजरीवाल मॉडेल ऑफ गव्हर्नन्सची कॉपी करण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे, अशी जोरदार टीका आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सावंत सरकारवर निशाणा साधताना त्यांनी सरकार तुमच्या दारी च्या नावाखाली प्रमोद सावंत यांनी चालविलेला करदात्यांच्या पैशाचा अपव्यय थांबवावा, असे सांगितले आहे. सावंत यांचा हा केवळ पीआर जुमला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अशा मोहिमांच्या माध्यमातून सेवा देण्या ऐवजी केवळ कॅमेऱयांसाठी राजकीय भाषणे दिली जात आहेत. याठिकाणी विविध सरकारी सेवेसाठी लोकांना प्रतीक्षा आणि रांगा लावाव्या लागतात. सावंत सरकार राबवत असलेली योजना ’आप’ची नक्कल असून यात अपूर्ण माहिती आणि नियोजनाचा अभाव असलाचे नाईक म्हणाले.
दिल्लीतील घरपोच दिल्या जाणाऱया सेवेची माहिती त्यांनी दिली. दिल्लीतील नागरिकांना टोल फ्री क्रमांकाद्वारे घरपोच सरकारी सेवा उपलब्ध होते. याउलट गोमंतकीय आता मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी रांगा लावत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
केजरीवाल मॉडेलची नक्कल करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यापूर्वी सावंत सरकारला आधी विचार करण्याची गरज आहे. प्रमोद सावंत सरकारने जनसंपर्क मोहीम थांबवावी आणि त्याऐवजी गोवेकरांसाठी काम करावे ” असे आप गोव्याचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले. नाईक पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राजकीय प्रचारावर करदात्यांच्या पैशाचा अपव्यय थांबवावा, असा सल्लाही नाईक यांनी दिला आहे.