मुंबई \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणावरून भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अन्य महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली. संभाजीराजे यांनी सरकारला तीन पर्याय सुचविले आहेत. तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत समाजाच्या विकासासाठी पाच मागण्याही सरकारसमोर मांडल्या आहेत. त्यामुळे येत्या ६ जूनपूर्वी या मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी, अन्यथा शिवराज्याभिषेकदिनी किल्ले रायगडावरून आंदोलन करणार तेव्हा कोरोना वगैरे पाहणार नाही, असा इशाराही खासदार त्यांनी दिला आहे. यानंतर आता संभाजीराजेंनी आज एक खळबळजनक ट्वटि करत, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे, असा आरोप केला आहे.
संभाजीराजे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. तसेच मला हेच लक्षात येत नाही की, माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. पण राज्य सरकार की केंद्र सरकार याबाबत त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळं संभ्रम निर्माण झाला आहे.
संभाजीराजे हे सध्या तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग किल्याच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आले होते. मात्र, समुद्र खवळलेला असल्यामुळं त्यांना किल्यावर जाता आलं नाही. यासंबंधी त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.