मगो नेते सुदिन ढवळीकर यांचा दावा म्हादई गमावली तरी मुख्यमंत्री गप्प का?
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील विद्यमान सरकार सर्व स्तरांवर अपयशी ठरले असून सरकारने प्रशासनावरील नियंत्रण पूर्णपणे गमावले आहे. मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, अन्य आयएएस अधिकारी यांच्यात पायपोस राहिलेला नाही. काही मंत्री मुख्यमंत्र्यांपेक्षाही वरचढ ठरत आहेत, आणि या सर्वांच्या वर भाजपातील एक पदाधिकारी सुपर सीएम बनून मुख्यमंत्र्यांवरच नव्हे तर प्रशासकीय कारभारातही हस्तक्षेप करत आहे, असा दावा मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. आपल्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनात एवढे निम्नस्तरावरील सरकार कधीच पाहिले नव्हते, असेही ते म्हणाले.
भाजमधील सदर पदाधिकाऱयाबद्दल यापूर्वी काँग्रेस व गोवा फॉरवर्ड या पक्षांनीही असाच दावा केला होता. त्यानंतर आता मगो पक्षानेही सरकारात सुपर सीएम कार्यरत असल्याचा दावा केला आहे, मात्र ’तो कोण?’ ते स्पष्ट न करता त्याबद्दल संपूर्ण गोव्याला माहिती आहे, असे उत्तर ढवळीकर यांनी दिले.
मगोच्या पणजी मुख्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोव्याची जीवनदायीनी म्हादई नदीच्या प्रश्नी श्री. ढवळीकर यांनी अत्यंत आक्रमकपणे विचार मांडले. मुख्यमंत्री म्हादईला केवळ ’आई, आई’ म्हणतच राहिले. त्यांच्या नजरेसमोर कर्नाटकाने म्हादई गिळंकृत केली तरीही ते गप्प आहेत. मुख्यमंत्री एखादे वक्तव्य करतात तेव्हा त्यांनी त्यानुसार वागले पाहिजे. ते जर खरोखरच स्वतःच्या आईप्रमाणे म्हादईवर प्रेम करत असते आणि तिच्याबद्दल स्वाभिमान बाळगत असते तर एव्हाना त्यांनी केंद्रात जाऊन बंड केले असते. पंतप्रधानांची भेट घेऊन आपल्या सरकारचा राजीनामाही सादर केला असता. परंतु मुख्यमंत्र्यांनी तसे काहीच केले नाही. परिणामी आता गोव्याने म्हादई जवळजवळ गमावली आहे, असे ढवळीकर म्हणाले. त्यासंबंधीचे सचित्र पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.
राज्यातील सहा पालिका आणि पणजी मनपासह काही ग्रामपंचायती आणि जिल्हा पंचायती यांची निवडणूक आणि पोटनिवडणूक दोन दिवसांवर आलेली असतानाही निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात सरकारला आलेल्या अपयशावर त्यांनी बोट ठेवले.
लोकायुक्त, निवडणूक आयुक्त यासारखी प्रतिष्ठेची पदे स्वीकारण्यास निवृत्त न्यायमूर्तीसारख्या व्यक्ती थेट नकार देऊ लागल्या आहेत, यावरून या सरकारवर कुणाचाच विश्वास राहिलेला नाही, हेच स्पष्ट होते. तसेच ही परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात आयएएस सारखे अधिकारी गोव्यात येण्यासही कचरतील किंवा नकार देतील, असे ढवळीकर म्हणाले.
हे सरकार प्रत्येक स्तरावर अपयशी ठरले आहे. प्रशासनावरील नियंत्रण गमावले आहे. मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, अन्य आयएएस अधिकारी यांच्यात पायपोस राहिलेला नाही. त्यामुळेच सरकारने स्वतःची इज्जत घालविली आहे, हे नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने पालिकांच्या आरक्षणासंबंधी दिलेल्या निवाडय़ावरून स्पष्ट झाले आहे. आता तर राज्य निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यातही सरकारला अपयश आले असून ’ना घर का ना घाट का’ अशी त्यांची स्थिती झाली आहे, अशी टीका ढवळीकर यांनी केली.
एसटी महामंडळाचा निधी बाजार प्रकल्पासाठी का?
अनुसूचित जमाती हा समाज स्थानिक भूमिपुत्रांचा आहे. त्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसटी महामंडळाचा सुमारे 12 कोटी निधी बाणस्तारी येथे बाजार प्रकल्प उभारण्यासाठी वापरण्यात येतो हा त्या समाजावर अन्याय आहे. त्यांचे हक्क हिरावून घेतल्यासारखे आहे. प्रत्यक्षात त्या बाजारात या समाजाचे किती लोक व्यापार करतात आणि सदर बाजार प्रकल्प कुणासाठी आहे याचा प्रत्येकाने अभ्यास करावा, असे ढवळीकर म्हणाले. या प्रकारावरून काही मंत्री मुख्यमंत्र्यांपेक्षा कसे वरचढ आहेत हेच सिद्ध होत आहे, असेही ढवळीकर म्हणाले.
पत्रकार परिषदेस कार्यकारी समिती सदस्य प्रताप फडते आणि अनंत नाईक यांची उपस्थिती होती.