घोडेस्वारीतील शानदार कामगिरीची शासनाकडून दखल : दोडामार्ग तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
दिल्ली येथे 29 ऑगस्टला : होणार पुरस्कार वितरण
तेजस देसाई / दोडामार्ग:
शासनस्तरावरील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अर्जुन पुरस्कार दोडामार्ग तालुक्यातील सरगवे पुनर्वसन गावचे सुपुत्र अजय अनंत सावंत यांना जाहीर झाला आहे. सावंत हे भारतीय सैन्यदलात 61 केबलरी या तुकडीत सुभेदार पदावर आहेत. घोडेस्वारी (टेंट पेग्गींग) या खेळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून या प्रकारासाठीच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी दोनवेळा त्यांचे या पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. मात्र, थोडक्यात संधी हुकत होती. यावर्षी मात्र त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्गचे पर्यायाने कोकण व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले आहे. या पुरस्काराचे वितरण 29 ऑगस्टला दिल्ली येथे राष्ट्रपती भवन येथे होणार आहे.
सावंत यांनी सैन्यदलात सुभेदार म्हणून काम करीत असताना एका अवघड समजल्या जाणाऱया घोडेस्वारी या खेळात विशेष ओळख निर्माण केली आहे. सावंत यांनी आजपर्यंतच्या खेळात भारत व भारताबाहेर अशा ठिकाणी तब्बल 156 पदक मिळवली आहेत. त्यातील काही निवडक 2015 पासून ते 2019 पर्यंतची कामगिरी अशी आहे. 25 फेब्रुवारी 2015 दिल्ली नोपेडा एशियन इंटरनॅशनल व नॅशनल (चार गोल्ड, तीन सिल्व्हर, दोन ब्रॉन्झ), 9 डिसेंबर 2015 वर्ल्डकप क्वॉलिफाय राऊंड दुबई आबूधाबी (तीन गोल्ड, दोन सिल्व्हर,) 11 एप्रिल 2016 दुसरा वर्ल्ड कप इजिप्त (तीन गोल्ड) 20 नोव्हेंबर 2017 भारत नॅशनल गेमवरून तिसऱया वर्ल्डकपसाठी निवड, 3 जानेवारी 2018 वर्ल्ड कप क्वॉलिफायर ऑस्ट्रेलिया (दोन गोल्ड, दोन सिल्व्हर, एक ब्रॉन्झ), 30 ऑक्टोबर 2018 व 2 नोव्हेंबर तिसरे वर्ल्डकप आबूदाबी यू.एस.ई. (एक सिल्व्हर), 10 डिसेंबर 2018 नॅशनल गेम (एक गोल्ड, सिल्व्हर) अशी पदकांची कमाई केली. आर्मीच्यावतीने याच त्यांच्या कामगिरीवर सहा पदके देऊन गौरव केला आहे. स्वतः घोडेस्वारीत नावलौकिक मिळविणाऱया सावंत यांनी आत्तापर्यंत घोडेस्वार खेळात सुमारे दहा हजार पाचशे विद्यार्थ्यांना एन. डी. एफ. खडकस्वार पुणे येथे प्रशिक्षण दिले आहे.
परमोच्च आनंदाचा क्षण!
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत म्हणाले, ‘तरुण भारत’ ने आपल्या कार्याची वारंवार दखल घेत कौतुकाची थाप दिली. शिवाय अनेकांचे आशीर्वाद आपल्या पाठिशी आहेत. देशाच्या नावलौकिकासाठी सुभेदार म्हणून कर्तव्य व खेळ प्रामाणिकपणे पार पाडले. याचे फळ म्हणून आपणाला हा अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला आहे. माझे सहकारी, गाववासीय व कुटुंबीय यांचे मी आभार मानत असून हा माझा परमोच्च आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले.
गावात होणार जल्लोषी स्वागत
सावंत हे दोडामार्ग तालुक्यात आल्यावर त्यांचे गावाच्यावतीने जल्लोशी स्वागत होणार आहे. पुरस्काराची बातमी न्यूज चॅनेलवर पाहिल्यानंतर गावात फटाके फोडून व मिठाई वाहून आनंद व्यक्त करण्यात आला. सावंत यांना पुरस्कार प्राप्त झाल्याने गावाच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला असून आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थ तथा ग्रामपंचायत सदस्य शंकर देसाई यांनी सांगितले.