प्रतिनिधी /रत्नागिरी :
रत्नागिरीत सायंकाळच्या सुमारास गेल्या चार दिवसांपासून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. रत्नागिरी तालुक्यातील केळये येथे एका घरावर आंब्याचे झाड मोडून नुकसान झाले.
गुरूवारी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासांत सरासरी पर्जन्यमान 30.78 झाले. रत्नागिरीत 65 तर संगमेश्वरमध्ये 72 मिमि पर्जन्यमानाची नोंद झाली असून दापोली 25, मंडणगड 24, खेड 9, गुहागर 27, चिपळूण 19, लांजा 17, राजापूर 19 मिमि पर्जन्यमान झाले. या पावसाने रत्नागिरी तालुक्यातील केळये येथील संदिप दशरथ नाखरेकर यांच्या घराच्या मागील बाजूवर कलमाचे झाड मोडून पडल्याने घराचे अंशत: नुकसान झाले, मात्र कोणालाही दुखापत झालेली नाही.
हंगामात समाधानकारक पर्जन्यमान
जिल्ह्य़ात यावर्षी जूनच्या प्रारंभापासून समाधानकारक पर्जन्यमान राहिले आहे. जिल्ह्य़ात सरासरी 4 हजार मिमि पर्जन्यमान असते. यावर्षी जूनच्या प्रारंभापासून महारेन मॅन्युअली पर्जन्यमान नोंदीनुसार एकूण 33859 मिमि व सरासरी 3762.11 पर्जन्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात 3977 मिमि, दापोली 3940, खेड 3388, गुहागर 3200, चिपळूण 3915, संगमेश्वर 3947, रत्नागिरी 3399, लांजा 3933, राजापूर 4160 मिमि एकूण पर्जन्यमान नोंदवण्यात आले आहे.