प्रतिनिधी/ पणजी
पोर्तुगीज राजवटीत गोवा अनेक भयानक संकटांना सामोरे गेला आहे. मात्र आपले गोमंतकीय अस्तित्व विसरला नाही. भारत स्वातंत्र्यानंतरही गोवा पोर्तुगीजांकडे राहिला होता. मात्र गोवा भारत देशाचा अविभाज्य भाग आहे हे भारत कधी विसरला नाही. साडेचार वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीच्या काळातही गोव्याची नाळ भारताकडेच जुळलेली होती. सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही काळ राहिले असते तर गोवा बऱयाच अगोदर मुक्त झाला असता, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील जाहीर सभेत केले.
गोवा हे पर्यटनस्थळ म्हणून जगात प्रसिद्ध आहेच, त्याच बरोबर शांतीप्रिय प्रदेश म्हणूनही गोव्याची ख्याती आहे. गोव्यात विविध धर्माचे लोक राहत असले तरी त्याच्यांत मतभेद नाहीत. येथील लोक मानवतेचे पुजारी आहेत, असे गौरवोद्गारही पंतप्रधानांनी यावेळी काढले.
गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्ष समारोप सोहळय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व बाबू आजगावकर, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, गोवा विधानसभा सभापती राजेश पाटणेकर, भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मंत्रीगण पाऊसकर, फिलीप नेरी, मायकल लोबो, जेनिफर मोन्सेरात, नीलेश काब्राल व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोव्याच्या विकासाची गती वाढतीच
गोव्याच्या विकासाची गती वाढतच आहे. ही गती अशीच वाढत राहिल्यास गोवा मुक्तीचे अमृत महोत्सवी वर्षात गोवा हे विकासाची उंची गाठणारे पहिल्या नंबरचे राज्य ठरणार असेही पंतप्रधान म्हणाले. गोव्याचे प्रशासन, दरडोही उत्पन्न व अन्य सगळ्याच गोष्टी देशात पहिल्या नंबरवर आहेत. कोविड लसीकरणाचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण करणारे गोवा हे पहिले राज्य असल्याने आपण गोवा सरकार आणि येथील जनतेचे खास अभिनंदन करीत असल्याचेही मोदी म्हणाले.
पाच स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान
या कार्यक्रमात गोवा मुक्तिलढय़ात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक गोविंद चिमुलकर, शारदा सावईकर, रोहिदास नाईक, गुरुदास कुंदे व जगन्नाथ शिरोडकर यांचा पंतप्रधानांच्या हस्ते शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
राज्यातील पाच प्रकल्पांचे लोकार्पण
राज्यातील पाच प्रकल्पांचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. त्यात आग्वाद तुरुंगांचे सुशोभीकरण, गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ, हवाई कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांचा त्यात समावेश आहे. यावेळी दोन टपाल तिकिट व मेघदुत या पोस्ट कार्डचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शाल, नंदादीप प्रदान केला. तसेच मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.
स्वागतपर भाषणात मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील विकासकामांचा तसेच राज्याच्या हीरकमहोत्सवी वर्षात केलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला.
पंतप्रधान गोव्यात पोहोचल्यानंतर त्यांनी दुपारी येथील आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहिली. नंतर मिरामार येथे हवाईदल व नौदल यांच्याकडून त्यांनी मानवंदना स्विकारली.