गावात तणाव,पोलिसांनी प्रकरण आणले नियंत्रणात, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार
प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्यातील एका गावच्या सरपंचाची एक सामाजिक संस्था आहे. त्या संस्थेत त्याच गावातील एक गरीब कुटुंबातील युवती कामाला होती. तिच्या गरीबीचा फायदा घेत तिला प्रेमाच्या जाळय़ात ओढल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आला. सरपंचाने त्या युवतीशी विवाह केल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. ही बाब सातारा तालुका पोलिसांना समजताच पोलिसांनी वेळीच गावात जावून शांततेचे आवाहन केले असले तरीही गावात अजूनही तणाव आहे.
सातारा तालुक्यातील एका गावातल्या सरपंचाची बहुउद्येशीय सामाजिक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत सातारा शहर व व तालुक्यात कामे केली जातात. तेथे गेल्या दीड वर्षापासून गावातील सर्वण समाजातील गरीब कुटुंबातील युवती कामाला जात होती. ती युवती गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता झाल्याने तशी पोलिसात खबर दिल्याचे कुटुंबिय सांगतात. कुटुंबियांना सरपंचानेच युवतीला पळवून नेवून विवाह केल्याचे समजताच गावात तणाव निर्माण झाला होता.
त्याच्या गावातील दुकानावर दगडफेकही करण्यात आल्याने तणाव निर्माण झाल्याचे सातारा तालुका पोलिसांना समजताच पोलीसांनी गावात जावून शांततेचे आवाहन केले. मात्र, त्या युवतीच्या कुटुंबियांनी सरपंचानेच फुस लावून पळवून नेल्याचा आरोप करत सातारा तालुका पोलीस ठाण्याबाहेर पोलीस आणि सरपंचाच्या नावाने त्रागा व्यक्त केल्याचे समजते.