ग्रा.पं.च्या आरक्षण सोडतीकडे नेतेमंडळी, गावकऱयांचे वेधले लक्ष
प्रतिनिधी/ रत्नागिरी
ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांचे तसेच सर्व गावकऱयांचे लक्ष आता सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असल्याचा दावा करत असली तरी सरपंच कुणाचा होणार? त्यावर गावचा कारभाराचे भवितव्य ठरणार आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतर त्यानुसार पुढील व्युहरचना आखण्याचे नियोजन त्या-त्या पॅनेलप्रमुखांवर येणार आहे.
नुकतीच जिल्हय़ातील जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 471 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यापैकी अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध तर काहींसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेतून पुढील 5 वर्षांसाठी ग्रा.पं.वर सदस्य मतदारांनी निवडून दिले आहेत. आता सर्वांचे त्यातून सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष वेधले आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीपूर्वी शासनाकडून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली होती. मात्र काही ठिकाणी तक्रारी उभ्या ठाकल्याने आरक्षण सोडत रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. प्रथम ग्रामपंचायतींच्या निवडणूका व त्यानंतर नव्याने आरक्षण जाहीर करण्याचे निश्चित झाले. त्यामुळे झालेल्या निवडणूकांवर चांगला परिणाम दिसून आला. काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडल्या. या निवडणूकांचे निकालही जाहीर झाले. राजकीय नेते मंडळींचे त्याविषयी आमच्याच पॅनेलने वर्चस्व मिळवल्याचे दावे-प्रतिदावे केले गेलेत. काही ठिकाणी तर ‘काटे की टक्कर’ असे चित्र दिसून आले. आता सरपंच निवड होणार असून कुठल्या प्रवर्गाला आरक्षण सुटणार? याची चिंता वाढली आहे.
त्यानुसार आता गावागावात गावकरी व राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्या-त्या पॅनेलप्रमुखांकडून निवडून आलेल्या सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. समर्थक सदस्य दुसऱया गटात किंवा पॅनेलमध्ये जाणार नाही याची सतर्कता बाळगली जात आहे. जिह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक संपल्यानंतर, आता सरपंच पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर एका महिन्याच्या आत सरपंच पदाची आरक्षण सोडत काढणे बंधनकारक आहे. दरम्यान, सरपंच पद मिळावे म्हणून इच्छुकांनी पॅनल व आघाडी प्रमुखांच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. काही जण म्हणतात, पूर्वीचेच आरक्षण रहावे! असे साकडे घालताना दिसत आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रा.पं.चे सरपंच आरक्षण 25 जानेवारी रोजी
ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता सन 2020 ते सन 2025 साठी ग्रामपंचायतींवर नव्याने विराजमान होणाऱया सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रा.पं.ची सरपंच आरक्षण सोडत 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मारूतीमंदिर येथील स्वा.वि.दा.सावरकर नाटय़गृहात होणार असल्याचे तहसिलदार प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.