सरवडेत ४१ दिवसात ३१ मृत्यू
प्रतिनिधी / सरवडे
कोरोनाची भिती घेऊन लोक जगत असतानाच राधानगरी तालुक्यातील सरवडे गावात १ ऑगष्ट पासून ९ सप्टेंबर अखेर तब्बल ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचा मृत्यू कोरोनाने नसला तरी मृत्यूची साखळी अखंड असून स्मशानभूमी कायम धगधगत आहे. पाठोपाठ होणार्या मृत्यूने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सगळीकडे चाललेले कोरोनाचे थैमान,ऊन पावसामुळे ताप थंडीच्या आजाराने वाढणारे पेशंट आणि विविध आजाराने दगावणारे लोक अशा निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आजार कमी आणि भिती जास्त झाल्यामुळे वयाची साठी ओलंडलेले अनेक पेशंट दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचार घेताना दगावले. ३१ मृत्यूंमध्ये सुमारे ७ लोक कोरोनाने तर २४ जण अन्य आजाराने मरण पावले आहेत. मरण पावलेल्यांमध्ये बिद्रीच्या पहिल्या महिला संचालिका पार्वतीबाई मोरे व दूधगंगा दूध संस्थेचे माजी चेअरमन शांताराम पाटील यांच्यासह अन्य प्रतिष्ठित नागरिकांचाही समावेश आहे. शिक्षक मधुकर कांबळे व किराणा व्यापारी एकनाथ पाटील दोन युवकांचा आकस्मिक झालेला मृत्यू ग्रामस्थांच्या मनाला चटका लावून गेला आहे.
लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या गावात सुरूवातीपासूनच कोरोना प्रतिबंधाची दक्षता घेतली आहे. मात्र काहींनी धुडकावलेले नियम व न घेतलेली दक्षता यामुळे चोरपावलांनी गावात कोरोनाने प्रवेश केला आणि त्यातच पावसाने जोर धरल्यानंतर तापाचे पेशंट वाढू लागले. ज्यांना केवळ ताप आहे अशांनी स्थानिक डॉक्टरांचा आधार घेतला तर स्थानिकला
ठीक न होणार्यांनी बाहेर उपचार सुरू केले. त्यामधे कांही बरे झाले तर अनेकांना जीव गमवावा लागला.
एका – एका दिवशी तर दोन तीन मृत्यूच्या घटना घडल्याने लोक अधिकच भयभीत होत आहेत. अगोदरच कोरोनाची भिती आणि सलग होणारे मृत्यू यामुळे लोक अंत्यसंस्कारलाही बाहेर पडताना घाबरू लागले आहेत. स्मशानभूमीत दोन दाहिनी असल्याने तिसऱ्या प्रेमाचे दहन उघड्यावर करावे लागत आहे. सरवड्याच्या इतिहासात प्रथमच अशी वेळ आली असल्याचे वयोवृद्ध सांगतात.
यांचा झाला मृत्यू
पार्वतीबाई मोरे, आनंदी मोरे, बेबीजान मुल्ला, अशमतबी नायकवडी, चंद्राबाई रानमाळे, गोपाळ कुंभार, अण्णा भामटेकर, मारुती मर्दाने एकनाथ पाटील, श्रीमाबाई वाईंगडे, शामराव पाटील शांताबाई मोरे, शेवंता मोरे, पांडुरंग खोराटे, प्रकाश व्हनगुते, मारुती मुरगुडे, तुकाराम गोजारे दत्तात्रय पवार दत्तात्रय पाटील प्रभाकर पिराले शांताबाई पाटील भगवान एरुडकर, शांताराम पाटील, कमल पाटील, शंकर पोवार,आनंदी कुंभार, बळवंत मोरे, सुशीला तोडकर, मधुकर कांबळे, चंद्रकांत तेली