प्रतिनिधी / सरवडे
लॉकडाउनच्या कालावधीतील वीज बिले चुकीची दिली असून त्याच्या निषेधार्थ येथील शेतकरी संघटना व ग्राहकांच्या वतीने वीज बिलांची होळी करण्यात आली. वीज बिले कमी करण्यासाठी मागणीचे निवेदन वीज वितरण कंपनीचे अभियंता संजय सानप यांना देण्यात आले.
कोरोनामुळे मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात वीज बिलांची रीडिंग घेतले नाही शिवाय लोक डाऊन असल्याने लोकांना वीज बिल भरणे अशक्य होते.
लाँकडाऊन संपल्यानंतर वीज वितरण कंपनीने सर्व ग्राहकांना तीन महिन्यांची बिले पाठवली मात्र पाठवलेली बिले धक्कादायक रकमेची आल्याने सामान्य माणसाला ती भरणे अशक्य बनले. लाँकडॉउन मुळे सामान्य माणूस आर्थिक अडचणीत असताना वीज कंपनीने भरमसाठ बिले माथी मारून ग्राहकावर अन्याय केला आहे. वीज कंपनीने शेतकरी व सामान्य ग्राहकांचा विचार करून वीज बिले कमी करावी व बिले भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आले आहे.
निवेदन देताना शेतकरी संघटनेचे रंगराव पाटील, पांडुरंग जरग, उदय मोरे, मनोज पोवार , शिवाजी खोत,जीवन कोतमिरे,विष्णू भोसले,रघुनाथ पाटील, प्रकाश मोरे, सातापा पाटील यांच्यासह गावातील वीज ग्राहक उपस्थित होते.