प्रतिनिधी / सरवडे
सरवडे परिसरात आज दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी साठे वाजता ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह जोराच्या पावसाला सुरूवात झाली. काळ्याकुट्ट अंधाराने गाव व्यापून गेला होता. आणि अचानक मोठा आवाज होवून हरीजन वाड्यातील घरावरून वीजेचा लोळ गेला. यामध्ये एक नारळाचे झाड जळाले. तर टि.व्ही.,संगणक संचही जळाले. मात्र त्यावेळी लोकांना इजा पोहचली नाही. दैव बलवत्तर म्हणूनच विजेचा लोळ अनेक घरांवरुन सरकत पुढे गेला. अन्यथा तो घरांवर पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेने बौध्दवस्तीत भितीचे वातावरण तयार झाले.
हा लोळ बुध्द विहारापासून सीताराम कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस भिमराव कांबळे, वसंत कांबळे, मिलिंद कांबळे, संभाजीराव कांबळे यांच्या घरावरून गेला. यामध्ये भिमराव कांबळे यांचे नारळाचे झाड जळाले. जवळच असलेल्या बिरेश्वर क्रेडिट सोसायटीचे संगणक व अनेकांच्या दूरदर्शन संचांचे नुकसान झाले. वीज पुरवठा बंद असल्याने मोठे नुकसान टळले. या विभागात असलेल्या दुरदर्शन केबल व मशिन खराब झाल्या. घटनेनंतर संपूर्ण हरिजन वाड्यात भितीदायक वातावरण झाले. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी हरिजनवाड्यात गर्दी केली. काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती. याची चर्चा ग्रामस्थ करीत होते. दैव बलवत्तर म्हणून आलेला मोठा अनर्थ टळला.