प्रतिनिधी/कसबा बीड
राज्य शासनाने शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा. शेतकऱ्याच्या मुलांची शैक्षणिक कर्जे माफ करावी यासह अन्य मागण्यासाठी कसबा बीड ( ता. करवीर ) येथील ऐतिहासिक आझाद हिंद चौकात २६ जानेवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मुंकूद उर्फ बंटी पाटील यांनी काल, गुरुवारी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
शेती पिकांना नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, स्वामीनाथन समितीच्या शिफारस लागू कराव्यात यासह इतर मागण्या संदर्भात हे आंदोलन करण्यात येणार आहे. बेमुदत ठिय्या आंदोलन हे लोकशाही शातंतेच्या मार्गाने सुरु होणार आहे. प्रजासत्ताक दिन असल्यामुळे ठिय्या आंदोलनास सकाळी दहा वाजता प्रारंभ होणार असल्याने पाटील यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार बैठकीला भाजप शेतकरी आघाडीचे करवीर तालुका अध्यक्ष दादा देसाई, (शिरोली दुमाला) मराठा विकास संघटनेचे करवीर तालुका अध्यक्ष शिवाजीराव लोंढे, ( सावरवाडी ) बैजू पाटील, रणधीर पाटील, कृष्णात पाटील, आदि उपस्थितीत होते.