ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेल्या एक – दोन वर्षात भाजप सरकारने सुरक्षेचं कारण देत अनेक व्यक्तींच्या सुरक्षेकरीता ‘वाय’ दर्जा सुरक्षा पुरवल्याची उदाहरणे आहेत. याच पार्श्वभुमीवर सद्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आलेला द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिर्गदर्शक विवेक अग्निहोत्री यांना देखील केंद्रातील मोदी सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्राने हा निर्णय घेतला आहे. यावरुन मतमतांतरे असतानाच शिवसेनेने यावर खरमरीत टीका करताना अशा प्रकारची सुरक्षा केंद्र सरकारकडून ‘चणे-कुरमुरे वाटावेत’ तशी वाटली जात असल्याचा टोला लगावला आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर समाजात समर्थन करणारा तसेच यावर आक्षेप घेणारा समाजात वर्ग तयार झाला आहे. यावरुन दिर्गदर्शक विवेक अग्निहोत्री यांना धमक्या आल्याचं कारण देत त्यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. यावरुन एका विशिष्ट विचारसणीच्या लोकांनाच अशा प्रकारची सुरक्षा पुरवली जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. मात्र त्याचवेळी खरोखरच परखडपणे मत मांडल्याबद्दल धमक्या मिळणाऱ्यांना सुरक्षा पुरवली जात नसल्याचंही शिवसेनेनं म्हटलंय.
“देशातील वातावरण मोकळे व सुरक्षित राहिलेले नाही. केंद्र सरकारने ऊठसूट ‘वाय’ पिंवा ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा जो सपाटा लावला आहे. त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे मोदी-शहांच्या काळात मोकळेपणाने जगण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. लोकांना उगाच भय वाटते. हे भय टोकाचे आहे. मात्र भाजपपुरस्कृत भयग्रस्तांना केंद्र सरकार खास सुरक्षा व्यवस्था पुरवीत आहे. त्यामुळे भाजपवर शिवसेनेनं केलेल्या जहरी टीकेला भाजप कशी प्रतिक्रीया देतं हे पाहणे महत्त्वाचं आहे.