प्रतिनिधी / बेळगाव
शहापूर, कोरे गल्ली येथे सरस्वती वाचनालयात दि. 25 व 26 रोजी सावरकर स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे विभागप्रमुख डॉ. विनोद गायकवाड उपस्थित राहणार आहेत. ते अनुक्रमे ‘महाकवी सावरकर व सावरकरांची जन्मठेप’ या विषयांवर बोलणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राजे हरिहरराव पटवर्धन सरकार उपस्थित राहणार आहेत.
डॉ. विनोद गायकवाड यांचा परिचय पुढीलप्रमाणे….
डॉ. विनोद गायकवाड हे पीएचडी पदवीधर असून राणी चन्नम्मा विद्यापीठामध्ये मराठी विभागप्रमुख म्हणून काम करत आहेत. आजपर्यंत त्यांच्या 54 कादंबऱया प्रकाशित झाल्या आहेत. त्यापैकी ‘साई’ ही शिर्डी साईबाबांची चरित्र कहाणी असून त्याचे सहा भाषेत अनुवाद झाले आहेत. ‘युगांत’ ही पितामह भिष्मांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. त्याचे तमिळ, हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवाद झाले आहेत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट युगारंभ या कादंबरीत मांडला आहे.
200 हून अधिक कथा लिहिल्या असून चार कथासंग्रह प्रकाशित आहेत. सात नाटके लिहिली आहेत. 50 हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. समकालीन कन्नड कथा हा त्यांच्या अनुवादित संग्रह आहे. गुलबर्गा विद्यापीठामध्ये प्रा. नागनाथ आवळे यांनी त्यांच्या कादंबऱयांवर पीएचडी पूर्ण केली आहे. कर्नाटक विद्यापीठात अमर कांबळे, साई व युगांत या कादंबऱयांचा अभ्यास यावर पीएचडी करत आहेत. चन्नम्मा विद्यापीठात संतोष मादाकाचे हेसुद्धा त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत.
पाच विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी व सहा विद्यार्थ्यांनी एमफील केली आहे. सध्या पाच विद्यार्थी पीएचडी करत आहेत. त्यांना चित्रकलेची आवड आहे. अनेक संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.