मुंबई क्रिकेट संघटनेची राज्य सरकारला विनंती
मुंबई / वृत्तसंस्था
कोव्हिड-19 मुळे 3 महिन्यांचा लॉकडाऊन झाल्यानंतर सराव सुरु करण्याबाबत शासनाने दिशानिर्देश द्यावेत, अशी विनंती मुंबई क्रिकेट संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तूर्तास, शार्दुल ठाकुरसारख्या काही खेळाडूंनी पालघरमध्ये गोलंदाजीचा सराव केला असून राष्ट्रीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने अलीकडेच ट्रेनर निक वेबच्या जिम रुटीनप्रमाणे हलक्या सरावाला सुरुवात केली आहे.
‘राज्य संघटनेच्या नात्याने आम्ही सरकारचे सर्व दिशानिर्देश, सूचनांचे पालन करत आलो आहोत आणि भविष्यातही आमची वाटचाल याच पद्धतीने सुरु राहील. याचवेळी, हजारो क्रिकेटपटू खेळाला सुरुवात होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अर्थात, या विषाणूच्या सोबत राहण्याची सवय करुन घ्यावी लागेल, अशीच सध्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने खेळाडूंसाठी दिशानिर्देश द्यावेत’, असे मुंबई क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी संजय नाईक व संयुक्त सचिव शाहलाम शेख यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद केले.
बृहन्मुंबई, ठाणे, खारघर व पालघर जिल्हे मुंबई क्रिकेट संघटनेच्या अखत्यारीत येतात. मुंबई क्रिकेट संघटनेचे कार्यालय दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या आवारात असून बीसीसीआय कार्यालयाप्रमाणेच ते देखील मार्चच्या मध्यापासून कुलूपबंदच आहे. देशात कोव्हिड-19 चा सर्वाधिक फटका ज्या भागांना बसला, त्यात मुंबई आघाडीवर आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 1365 नवे रुग्ण आढळले तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे रुग्णांची संख्या 70990 वर तर बळींची संख्या 4060 वर पोहोचली होती.