अन्नदान हे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं. आपल्या आसपास असंख्य भुकेले लोक आहेत. अनेकांकडे दोन वेळचं जेवण्याइतके पैसे नसतात. पोटातली भूक घेऊन कुठे जायचं असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. दिल्लीच्या सरिता कौशिक यांनी या प्रश्नावर स्वतःपुरतं उत्तर शोधलं आहे. सरिता या एकल माता. त्यांच्यावर मुलीचीही जबाबदारी आहे.ही सगळी जबाबदारी सांभाळत त्या एकटय़ा लढत आहेत. सरिता ‘अपनापन राजमा चावल’ स्टॉलच्या माध्यमातून भुकेल्यांना अन्न पुरवत आहेत. सरिता यांचं बालपण निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं. इथे त्यांना सगळ्या सोयीसुविधा मिळाल्या नसल्या तरी चांगले संस्कार मिळाले. लहानपणी त्या जवळच्या गुरुद्वारामधल्या लंगरमध्ये मदत करायला जात असतं. या लंगरमध्ये हजारो लोक जेवायला येत असत. एखाद्या भुकेल्या जीवाला अन्नदान केल्याचं सुख काय असतं हे त्यांनी इथे अनुभवलं होतं.
सरिता ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत होत्या. जवळपास 19 वर्षं त्यांनी गाडय़ांसोबत घालवली. मात्र कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यानंतर त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं होतं. सोबतच लोकांना मदत करायची होती. आर्थिक अडचणी आणि मुलीची जबाबदारी यामुळे त्यांना ना नफा ना तोटा तत्त्वावर काही करता येणं शक्य नव्हतं. मग त्यांनी राजमा चावलचा स्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून त्यांना उत्पन्नही मिळणार होतं. शिवाय गरजूंना अन्नदान करणंही शक्य होणार होतं. अपनापन राजमा चावल या नावाने त्यांचा स्टॉल सुरू झाला. या स्टॉलवर चाळीस रूपये हाफप्लेट आणि 60 रूपये फुल प्लेट या दराने राजमा चावलची विक्री सुरू झाली. सरिता यांच्या हातचा चविष्ट राजमा चावल खायला लोक गर्दी करू लागले.
सरिता पहाटे चार वाजता उठून राजमा चावल बनवण्याच्या तयारीला लागतात. दोन पातेल्यांमध्ये राजमा आणि चावल भरून स्टॉलवर नेतात. या पातेल्यांमधल्या गरमागरम आणि वाफाळत्या राजमा चावलचा आस्वाद घेणं म्हणजे स्वर्गीय आनंद असतो. त्यांचा स्टॉल आंटीज स्टॉल या नावाने प्रसिद्ध आहे. सरिता दिवसभरात साधारण 100 प्लेट राजमा चावल विकतात. त्यापैकी 60 टक्के राजमा चावल ग्राहकांना तर उर्वरित 40 टक्के प्लेट्स गरीब, वंचित घटकातल्या लोकांना मोफत दिल्या जातात. त्यांना ‘अपनापन राजमा चावल’ची होम डिलिव्हरी सुरू करायची आहे. सोबतच अन्नदानाचं कार्यही सुरू ठेवायचं आहे. सरिता यांचं समाजकार्य अनेकांसाठी आदर्शवत ठरू शकतं.