विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानवी समाजाने जेवढी भरारी घेतलेली आहे, त्यामुळे एकेकाळी असंख्य माणसांच्या आणि सजीवांच्या मृत्यूचे कारण ठरणारे साथीचे रोग आज विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत. प्लेग, कॉलरा, टायफाईड, मलेरियासारख्या रोगांनी जगभर हाहाकार माजविला होता. परंतु आज हे रोग बऱयाच प्रमाणात नियंत्रणाखाली असताना नवनवीन रोगांनी माणसाच्या आयुष्याचा खेळखंडोबा मांडलेला आहे. वैज्ञानिकांनी आरंभलेल्या परिश्रमाचे फळ म्हणून मानवी मृत्यूस कारणीभूत ठरणाऱया जहाल सर्पदंशावर प्रति सर्पविष एकेकाळी प्रभावी ठरले होते. प्रति सर्पविषामुळे नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चार सापांच्या जहरी दंशावर इलाज व्हायचा. हे चारही जहरी साप भारतभर लोकांना दंश करून, त्यांच्या मृत्यूस कारण ठरत असल्याचे स्पष्ट झाल्याने चार सापांच्या दंशाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी प्रति सर्पविष तयार करण्यात यश संपादन केले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून हे प्रति सर्पविष वापरून सर्पदंशामुळे उद्भवणाऱया मृत्यूंना रोखण्यात विज्ञानाचे हे औषध उपयुक्त ठरले होते.
परंतु बेंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्थेने जेरी मार्टिन सर्वेक्षण प्रकल्प, कर्नाटक, मद्रास मगर बँक प्रतिष्ठान आणि सर्पविज्ञानशास्त्र केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतलेल्या अभ्यास प्रकल्पातून व्यावसायिकरित्या उपलब्ध प्रतिसर्पविष काही औषधदृष्टय़ा महत्त्वपूर्ण आणि उपेक्षित सापांच्या दंशावरती उपाय करण्याच्या दृष्टीने प्रभावहीन ठरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. सदर सापांचे दंश मानवी समाजावर बरेच दुष्परिणाम करत असले तरी त्यांचा अत्यल्प अभ्यास आणि संशोधन करण्यात आलेले आहे. आज देशभरातल्या राज्यस्तरावरच्या अथवा जिल्हा स्तरावरच्या इस्पितळात नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या केवळ चार सापांच्या दंशांवर प्रभावी ठरणारे प्रतिसर्प विष उपलब्ध असले तरी बऱयाचदा रुग्णाला उशिरा आणल्याने त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचाराऐवजी अभ्यास न करता झाडपाल्यांची औषधे दिल्याने सर्पदंशाने मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्या लक्षणीय आहे.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार देशभरात सर्पदंशाने दरवर्षी सुमारे 45 हजार लोक मृत्यूमुखी पडत असल्याचे उघडकीस आलेले आहे. त्याशिवाय 1,40,000 लोकांना सर्पदंशामुळे नाना प्रकारच्या शारीरिक विकलांगतेला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी सर्पदंशाने मृत्यूमुखी आणि विकलांगतेची शिकार होण्याचे प्रमाण लक्षणीय होत चालले आहे ही खरेतर खेदजनक बाब आहे. आजही आपल्या देशात सर्पदंशावर वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित उपचार करण्याऐवजी ढोबळमानाने झाडपाल्यांवरच्या औषधांचा वापर केला जातो. बऱयाचदा सापाच्या दंशाची योग्य चिकित्सा न करता प्रतिसर्पविषाची चुकीची मात्रा दिली जाते आणि त्यामुळे उपचार होण्याऐवजी रुग्णाला समस्यांना सामोरे जाण्याची पाळी येत असते.
प्रतिसर्पविषाची मात्रा एखाद्या रुग्णाला देताना खरेतर त्याला झालेला सर्पदंश हा विषारी की बिनविषारी याची शहानिशा करून देणे गरजेचे असते. परंतु याबाबत विषारी गणल्या गेलेल्या सापांच्या प्रवृत्तीची आणि त्यांच्या विषात असलेल्या गुणधर्मांची माहिती नसताना बरेच डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात आणि त्यांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. सर्पदंशाचे प्रमाण भारतात अन्य राष्ट्रांच्या तुलनेत लक्षणीय असल्या कारणाने आणि त्यातून मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्याही मोठी असल्याने आपल्या देशाचा सर्पदंशाची राजधानी असा उल्लेख केला जातो. भारतात 270 सापांच्या प्रजाती असून, त्यातील सुमारे 60 साप वैद्यकीयदृष्टय़ा महत्त्वाचे मानलेले आहेत. आपल्याकडे सर्पदंशावर देण्यात येणारे प्रतिसर्पविष तयार करताना नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चार सापांचा विचार केला होता आणि त्यामुळे हे प्रतिसर्पविष खरेतर या चार सापांवरच्या विषाच्या मात्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. परंतु असे असताना अन्य विषारी सापांच्या दंशावरही हे प्रतिसर्पविष देण्यात येत असते. गेल्या कित्येक वर्षापासून प्रतिसर्पविषाची मात्रा देताना अन्य विषारी सापांचा विचार करण्याची नितांत गरज होती.
प्रतिसर्पविषाचा अन्य सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करताना कोणते परिणाम होतात, या संदर्भातील सविस्तर अभ्यास आणि संशोधन करण्याची जबाबदारी स्वीकारून संशोधकांनी द्विस्तरावर भर दिला होता. त्यासाठी त्यांनी सोचूरेक फुरसे, सिंधी मण्यार, पट्टेरी मण्यार आणि दोन एका डोळय़ाच्या नागाबरोबर फुरसे, घोणस, नाग आणि मण्यार यांच्या विषात असलेल्या गुणधर्माचा अभ्यास केला. सखोल चिकित्सक पद्धतीने अभ्यास केल्यावर एकाच प्रजातीतील उपप्रजातीतच नव्हे तर एकाच प्रजातीतील भिन्न भौगोलिक प्रदेशातल्या सापांच्या विषात असलेल्या गुणधर्मात भिन्नता दृष्टीस पडलेली आहे. भारताच्या पूर्व भागातल्या प. बंगाल आणि अरुणाचल प्रदेशात आढळणाऱया मोनोकलेड कोब्रा (मागच्या बाजूला एक डोळय़ाची आकृती असलेला नाग) या प्रजातीतल्या नागाच्या विषात भिन्नता आढळलेली आहे. बंगालमधील मोनोकलेड नागाच्या दंशाने माणसाच्या मज्जासंस्थेवर तर याच प्रजातीच्या अरुणाचल प्रदेशात आढळणाऱया नागाच्या विषाचा दुष्परिणाम मानवी पेशीवर होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
व्यावसायिक तत्त्वावर उपलब्ध प्रतिसर्पविषाची देण्यात आलेली मात्रा उंदरावर करण्यात आलेल्या प्रयोगातून मोनोकलेड नागाच्या अरुणाचल प्रदेशातील प्रजातीच्या दंशावर प्रभावहीन ठरल्याचे स्पष्ट झालेले आहे. उत्तर भारतातील सर्वसाधारण मण्याराच्या सर्पदंशावर प्रतिसर्पविष प्रभावहीन ठरल्याचे दृष्टीस पडलेले आहे. या अभ्यासाद्वारे सिंधी मण्यार साप हा भारतात आढळणाऱया समस्त विषारी सापांच्या प्रजातीत सर्वाधिक जहरी साप ठरलेला आहे. त्यामुळे आज भौगोलिक क्षेत्रानुसार भिन्न उपप्रजातीनुसार सर्पदंशाच्या रुग्णावर प्रतिसर्पविष विकसित करण्याची गरज उद्भवलेली आहे आणि त्यादृष्टीने अभ्यास आणि संशोधन गतिमान केले पाहिजे.