महिलांचा सन्मान करूनच होणार भारताचा विकास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांच्या स्वयंसहाय्य समुहांमध्ये यूनिकॉर्न निर्माण करण्यावर भर देत भारताने मागील 9 वर्षांमध्ये ‘महिला विकासा’पासून ‘महिलांच्या नेतृत्वाखालील विकासा’च्या दिशेने वाटचाल केल्याचे शुक्रवारी म्हटले आहे. भारतात आज इंजिनियरिंग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांच्या प्रवेशाचे प्रमाण 42 टक्के आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशांपेक्षाही हे प्रमाण खूपच अधिक असल्याचे मोदींनी ‘महिला सशक्तीकरण’ विषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना नमूद केले आहे.
स्वयंसहाय्य गटांमध्येही यूनिकॉर्न निर्माण करण्याची गरज आहे. याकरता यंदाच्या अर्थसंकल्पात नवा दृष्टीकोन मांडण्यात आला असल्याचे मोदींनी म्हटले आहे. एक अब्ज डॉलर्सचे मूल्य असणाऱया स्टार्टअप किंवा कंपन्यांना यूनिकॉर्न संबोधिले जाते. मुद्रा कर्ज योजनेच्या अंतर्गत 70 टक्के लाभार्थी महिला आहेत. या महिला स्वतःच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासह देशासाठी नवे आर्थिक द्वार खुले करत आहेत. आमच्या मुली सैन्यात सामील होत देशाची सुरक्षा करताना दिसून येतात, राफेलचे उड्डाण करताना दिसून येतात, तेव्हा त्यांच्याबद्दलची मानसिकता देखील बदलते. महिलांचा सन्मान वाढवून, समानतेचा भाव वाढवूनच भारत वेगाने विकास करू शकतो असे मोदींनी म्हटले आहे.
वैद्यकीय, क्रीडा, उद्योग किंवा राजकारण इत्यादी सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांची भागीदारी वाढली आहे. याचबरोबर महिला सर्वच क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहेत. भारतातील अनेक क्षेत्रांमध्ये महिलाशक्तीचे सामर्थ्य दिसून येते. भारताने मागील काही वर्षांमध्ये आवास योजनेच्या अंतर्गत 3 कोटीहून अधिक घरांची निर्मिती केली आहे. यातील बहुतेक घरे ही महिलांच्या नावावर असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.