विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची मागणी
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात कोविडची परिस्थिती भयानक झालेली आहे. कोविड इस्पितळात ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या तक्रारीचे अनेक फोन कॉल्स आम्हाला येत आहेत. रुग्ण गुदमरत आहेत, मात्र सरकार बेफिकीर आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून गोव्यातील ऑक्सिजन पुरवठा सुविधेची व एकंदर व्यवस्थापनाची पाहणी करावी व सत्यपरिस्थिती लोकांसमोर ठेवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी भाजप सरकारवर राहील हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे. इस्पितळात ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक प्रमाणात होत नाही व रुग्णांना तो बरोबर मिळत नाही, अशा वाढत्या तक्रारी येत आहेत. लोकांना ऑक्सिजनचे सिलिंडर मिळत नाहीत. सरकारची सर्व यंत्रणा कोसळली आहे, अशी टीका कामत यांनी केली आहे. सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सगळय़ा सुविधांची पाहणी करू देण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
लॉकडाऊन म्हणण्याची हिंमत का झाली नाही ? लोक लॉकडाऊनची मागणी करत असताना लॉकडाऊन हा शब्द उच्चारण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना का झाली नाही, असा सवाल प्रतिक्रिया व्यक्त करताना कामत यांनी केला आहे. केवळ कर्फ्यू लावून चालणार नसून कडक निर्बंध पाळल्याशिवाय परिस्थिती आटोक्मयात येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.