प्रतिनिधी / सातारा
सातारा – १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करताना मानव विकास निदर्शकांचा विचार, विविध योजनांचे अभिसरण करावे. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजांची पूरर्ता झाली पाहिजे, यासाठी आराखडा लोकसहभागातूनच बनला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी प्रतिपादन केले.
वर्ये, ता. सातारा येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत आमचं गाव, आमचा विकास कार्यक्रमांर्तग विस्तार अधिकाऱ्यांच्या ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधीचे प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, विस्तार अधिकारी संदीप दिक्षित उपस्थित होते.
गौडा म्हणाले, ग्रामविकास आराखडे बनवित असताना विस्तार अधिकारी यांची महत्वाची भूमिका आहे. त्यांनी गणस्तरावर ग्रामसेवक व सरपंचांना प्रशिक्षण देत असताना गावातील गरजांचा विचार करूनच आराखडे बनवण्याचे प्रशिक्षण द्यायचे आहेत. त्याचबरोबर अनेक विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रशासकाची जबाबदारी असल्याने त्यांना स्वतःला आराखडे बनवायचे आहेत. जलजीवन मिशन योजनेचा समावेश करून मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये शंभर टक्के नळजोडणी पूर्ण होईल, असा प्रयत्न करावा. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत योजनेचे अभिसरण करून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्याबाबतच्या तरतूदी ग्रामपंचायत विकास आराखड्यात कराव्यात.
अविनाश फडतरे म्हणाले, ग्रामपंचायत विकास आराखड्यातील बंधित व अबंधित निधीचा अभ्यास करून लोकसहभागातून जल पुनर्भरण, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवावे. विविध योजनांचे अभिसरण करून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. महिला बचत गट, तरुण आणि शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढिच्या दृष्टीने मानव विकास निर्देशकांनुसार उपजिविकेची साधने निर्माण करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे नियम असल्याने ग्रामसभा घेता येत नाही. पण वॉर्ड सभा, महिला सभा, बाल सभा, आणि वंचित घटकांच्या सभा घेऊन त्यांनी मांडलेले प्रश्न आणि मागण्यांचा विचार करून त्याप्रमाणे विशेष मासिक सभेत आरखडे तयार करण्यात यावे, असे फडतरे यांनी सांगितले.
सुवर्णा चव्हाण म्हणाल्या, विस्तार अधिकाऱ्यांना जबाबदारी असलेल्या प्रशासकांनी ग्रामसंसाधन गटांचा प्रभावी वापर करून विकास आराखडा तयार करावा. यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. प्रवीण प्रशिक्षक प्रदीप पाटणकर, किरण कदम, विनोद भागवत, स्वप्नील शिंदे यांनी विस्तार अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत विकास आराखड्यांसंबंधित प्रशिक्षण दिले.
Next Article कोपार्डे जनावरांचा बाजार ७ महिन्यानंतर होणार सुरू
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.