कोणे एके काळी सीसीटीव्ही हे प्रकरण मला सर्वसाक्षी वाटले होते. एकदा तो चालू केला की त्याला सर्व काही दिसते. सीसीटीव्ही लावलेल्या अनेक कचेऱयांमध्ये पाटय़ा असतात. तुम्ही सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहात. सीसीटीव्ही बघतोय हं!
मात्र पुढेमागे आपल्यावर पाळत ठेवणारी कृत्रिम शक्ती आपल्याशी संवाद देखील साधील असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. पण तसे घडले बुवा.
आपण घरातून बाहेर पडलो आणि चहा प्यायला गेलो, दुकानात गेलो, दवाखान्यात गेलो, सभेत गेलो, वाटेत रिक्षा किंवा कॅबमध्ये बसलो तरी या शक्तीचे आपल्यावर लक्ष असते. आपण जरा उसंत घ्यायला थांबलो की खिशातला फोन वाजतो. आपण फोन उघडून पाहिला की पडद्यावर हा किंवा तो प्रश्न असतो. चहा आवडला का? दुकानात कसे वाटले? डॉक्टरांचा अनुभव कसा होता? सभेतले भाषण आवडले का? रिक्षा किंवा कॅबचा चालक नीट वागला का? त्याने योग्य पैसे घेतले का? वगैरे.
काही दिवसांपूर्वी एक श्रीमंत परिचित आजारी पडले आणि महागडय़ा रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या समाचाराला गेलो. बाहेर स्वागत कक्षाच्या कोपऱयात एका वित्त कंपनीची प्रतिनिधी बसली होती. समाचारानंतर रुग्णालयाच्या बाहेर पडलो तेव्हा फोनवर त्या वित्त कंपनीचा मेसेज होता, ‘तुम्हाला शस्त्रक्रियेसाठी सुलभ हप्त्यांवर कर्ज हवे आहे का?’
हे काहीच नाही. गेल्या आठवडय़ात माझ्या आईला हाडवैद्यांच्या रुग्णालयात न्यावे लागले. तिथून आल्यापासून ‘रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करा!’, ‘शस्त्रक्रियेशिवाय गुडघेदुखी बरी करा!’ वगैरे आशयाचे विविध कंपन्यांचे संदेश माझ्या फोनमधून सांडत आहेत!
हे असे झाल्यामुळे मी आता सावध झालो आहे. कालचीच गोष्ट. एका मित्राचा मोबाईल हरवला होता. एफआयआरसाठी त्याच्या बरोबर पोलीस चौकीत सोबत गेलो होतो. काम झाल्यावर तिथून बाहेर पडलो. त्याचा मोबाईल हरवलेला असल्यामुळे त्याला कुठलाही मेसेज आला नाही. पण मला मात्र,
“तुम्हाला कोणी चिरीमिरी मागितली नाही ना?’’
“तुम्हाला पोलीस चौकीत का जावे लागले? तिथला अनुभव कसा होता? जामीन घेण्यासाठी वकिलाचा सल्ला हवा आहे का?’’ असा कोणताही मेसेज आला नाही.
याचे कारण सांगू?
पोलीस चौकीत जाताना मी माझा फोन बरोबर नेला नव्हता!