नगर / प्रतिनिधी :
सध्या एका विरुद्ध तीन अशी लढत असल्याने भाजप मागे असल्याचे भासवले जात आहे. परंतु आजही देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षच नंबर एकवर आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही भाजपाने चांगले यश मिळविले आहे. आम्ही आज विरोधात असलो तरी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत राहू, अशी माहिती माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीस यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सविता भानुदास बेरड, विवेक भानुदास बेरड, युवराज पोटे, शामराव पिंपळे, ऍड. विवेक नाईक, प्रसाद ढोकरीकर, भैया गंधे, सुभाष बेरड, रमेश पिंपळे, भाऊ रासने आदी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, भाजपा सरकारच्या काळात सर्वसामान्य, शेतकरी अशा सर्वांसाठी अनेक योजना राबविल्या. त्याचा फायदाही झाला. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी युतीला जनादेश दिला. परंतु शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला. मात्र, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी भाजपा लढत राहील. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करत असून, येणाऱया काळात पक्ष आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.