केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे राजेंद्र मसुरकर यांची मागणी
ओटवणे / प्रतिनिधी:
देशातील श्रीमंत व गोरगरीबांना गॅस सिलेंडर दर एकच असुन सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ९०० गॅस सिलेंडर हा दर परवडणारा नाही. त्यामुळे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ४०००० रूपयापेक्षा कमी आहे आणि ज्यांना रेशनिंग दुकानात धान्य मिळते अशा गोरगरीब जनतेला सध्याच्या बाजार भावाच्या ५० टक्के सवलतीमध्ये गॅस सिलेंडर मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा जिवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली आहे.
सध्या भारत गॅस कंपनीचा गॅस सिलेंडर ९०० रुपयाला घरपोच दिला जातो. भारत गॅस कंपनीच्या सिलेंडरचा दर गेल्या सात वर्षात दुप्पट झाला असून सर्वसामान्यांचे घर खर्चाचे बजेट बिघडले आहे. सर्वसामान्य गोरगरीब अनेक कुटुंबे दारिद्य्ररेषेखाली आहेत. संजय गांधी निराधार योजनेखाली अनेक निराधार, अंध, अपंग, मूकबधिर, कर्णबधिर, विधवा पत्नी, वृद्धापकाळ व्यक्ती, घटस्फोटीत महिला, दुर्धर आजाराने त्रस्त व्यक्ती आहेत. त्यांना मासिक एक हजार रुपये मानधन आहे. अशा व्यक्तींनाही भारत गॅस कंपनीच्या सिलेंडरचा ९०० रुपयालाच घरपोच मिळतो. त्यामुळे हजार रुपयात या सर्वांनी आपला घरखर्च कसा भागवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
गॅस सिलेंडरचे दर गोरगरीब जनतेच्या आवाक्याच्या बाहेर गेले असुन आता चुलीवरती जेवण बनवण्यासाठी लाकडाचा वापर वाढल्यास त्यासाठी लाकूडतोडीमुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. याचा केंद्र शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून गोरगरीब जनतेला बाजार भावाच्या ५० टक्के सवलतीमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावा बागडी अशी मागणी राजू मसुरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली आहे.