राष्ट्रसेवा आणि समाजाच्या उत्कर्षासाठी निस्वार्थपणे निरंतर कार्यरत राहणे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनाचे सार आहे. राष्ट्र आणि समाजासाठी समर्पित असा एक निरंतर प्रवासी असे त्यांचे वर्णन करता येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिबिंब पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यात, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात केवळ दिसले नाही तर झळाळून निघाले. संघाची तपश्चर्या आणि ध्येयपूर्तीकडे जाण्यासाठी केलेला संघर्ष आज फळास येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशाला त्याच ध्येयपूर्तीकडे घेऊन जात आहेत. त्यामुळेच केवळ भाजपा आणि संघालाच नव्हे तर संपूर्ण देशाला नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान आहे. देशात आणि जगातही त्यांना लाभलेली लोकप्रियताही हेच सांगते. मोदींनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून जगात भारताचा मान उंचावला आहे याबाबत कुणी संदेह बाळगणार नाही. एका सामान्य कुटुंबातून बाहेर पडलेला हा माणूस. आज त्यांच्याकडे सारे जग अपेक्षेने पाहत आहे. असे यापूर्वी कधी घडले नव्हते.
माझा आणि नरेद्र मोदींचा संपर्क आणि सहवास 1980 पासूनचा. मी मुंबईत प्रचारक होतो. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये विभाग प्रचारक होते. त्यामुळे मुंबईत भेटणे होत होते. त्यांच्यातील नेतृत्वगुण, त्यांची कार्यक्षमता, राष्ट्राप्रती असलेली निर्मळ भावना त्या काळातही दिसून येत होती. कार्य कर्तृत्वाच्या बळावरच ते पुढे पुढे जात राहिले. संघसेवेत कोणताही कमीपणा न बाळगता अनेक छोटय़ा छोटय़ा जबाबदाऱया पार पाडतच मोदींनी आकाशाला गवसणी घातली. आज अत्यंत वेगाने ते ध्येयपूर्तीकडे जात आहेत. पावला पावलांवर यश प्राप्ती करीत आहेत. मात्र, संघ स्वयंसेवक म्हणून जे नरेंद्र मोदी समाजात मिसळले होते ते आजही तसेच आहेत. त्यांच्या कानात कधी वारा शिरला नाही. पाय जमिनीवरच असलेला हा नेता आपल्या देशबांधवांपेक्षा कधी मोठा झाला नाही. राष्ट्र प्रथम या तत्त्वाचा विसर त्यांना पडला नाही. ते स्वतःला जनतेचे प्रधान सेवक म्हणवून घेतात यातच सारे काही आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गोळवलकर गुरुजींचा प्रभाव आहे. गोळवलकर गुरुजींचाच संदेश ते जगले. दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या पावलांवर पाऊल ठेवूनच मोदींनी जीवनाचा प्रवास केला. संघाचा आदर्श बाळगून तो आचरणात आणणारा कार्यकर्ताच खरा स्वयंसेवक असतो. मोदींनी संघाचा आदेश शिरोधार्य मानला. संघ म्हणेल ती जबाबदारी त्यांनी पार पाडली. गुजरातचे मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान म्हणून दिलेली जबाबदारी हा संघाचाच आदेश होता. मोदींनी आतापर्यंत मागून काहीही घेतलेले नाही. त्यांच्याकडे ज्या ज्या जबाबदाऱया आल्या ती संघाचीच इच्छा होती. या जबाबदाऱयांकडे त्यांनी संघाचे दायित्व म्हणूनच पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज नरेंद्र मोदींसाठी दैवतच. महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील एखादा तरी दुगुर्ण ंिंकवा दोष कोणी तरी दाखवावा असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याच मागच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री स्व. अनिल दवे यांनी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकासाठी स्वतः नरेंद्र मोदींनीच प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेत मोदी म्हणतात की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील पहिली 24 वर्षे सोडल्यास 36 वर्षे त्यांनी राज्यसत्ता सांभाळली. या 36 वर्षांत केवळ 6 वर्षे त्यांनी लढाया केल्या. उर्वरित 30 वर्षे त्यांनी केवळ जनसेवा केली. राजाने जनतेची सेवा कशी करावी याचाच धडा छत्रपतींनी आपल्या राज्यकारभारातून घालून दिला होता असे पंतप्रधान मोदी म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रभावामुळेच मोदी पंतप्रधान झाल्यानंतर रायगडला भेट देऊन तिथे नतमस्तक झाले होते. कधी कर्तव्यकठोर तर कधी मृदू हे छत्रपती शिवरायांतील गुण मोदींमध्ये दिसून येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी मला आलेला एक अनुभव इथे कथन केल्याशिवाय राहवत नाही. गोष्ट बऱयाच वर्षांपूर्वीच्या गोव्यातील निवडणूक प्रचारातील आहे. डिचोलीत संध्याकाळच्या वेळी सभा होती. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांची लोकप्रियता देशभर चर्चेत होती. लोक त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असत. डिचोलीच्या सभेला मोदी बोलणार म्हणून अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी जमली होती. मोदींचे स्वागत करण्यासाठी मी दाबोळीच्या विमानतळावर हजर होतो. गुजरातहून दाबोळीत उतरायला मोदींना थोडा उशिरा झाला. मोदी दाबोळीहून हेलिकॉप्टरमधून डिचोलीला जाणार होते. हेलिकॉप्टर सज्ज होते. मी व मोदी हेलिकॉप्टरमध्ये विराजमान झालो. मात्र, वैमानिक सूर्यास्त झाल्याने हेलिकॉप्टर उडवण्यास तयार नव्हते. बाकाप्रसंग उद्भवला होता. वैमानिक नियम डावलून धोका पत्कारण्यास तयार नव्हते. मी वैमानिकाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नियमावर ठाम राहिला. शेवटी मोदींनीच सूचना केली. चला उतरूया. मग आम्ही हेलिकॉप्टरमधून उतरलो. ती सभा झाली. मात्र, लोकांना मोदी ऐकता आले नाहीत. मोदी काही वेळ विमानतळावरच थांबले. चर्चा केली व पुन्हा गुजरातकडे रवाना झाले. यातून एक गोष्ट दाखवून दिली की इतरांवर दबाव आणून त्यांच्या कर्तव्यात कुणी बाधा आणू नये. देशातील एका मोठय़ा राज्याचे मुख्यमंत्री असूनही त्यांनी त्या वैमानिकाविरुद्ध ‘ब्र’ काढला नाही. योग्य मार्गाचा अवलंब करणाऱया, नियमाने वागणाऱया व्यक्तींचा त्यांनी नेहमीच आदर केला. या वैमानिकांच्या घटनेतही त्यावेळी मला हाच अनुभव आला. असे हे भारताचे पंतप्रधान. सामान्यांच्या समस्यांबाबत त्यांना कळवळा आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी लाल किल्ल्यावरून शौचालयाचा विषय मांडला. सर्वसामान्यांच्या बारिकसारिक समस्यांनाही हात घालून पंतप्रधांनी लोकांच्या मनात स्थान मिळवलेले आहे. अशा वागणुकीमुळेच ते देशातील सर्वसामान्य जनतेला आपल्याच घरातील माणूस असल्यासारखे वाटते.
मोदींचा 70 वाढदिवस साजरा करण्याच्या निर्णयासाठी जेव्हा भाजपाचे कार्यकर्ते एकत्र आले तेव्हा मोदींनीच याला विरोध केला होता. शेवटी कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल म्हणून त्या निमित्ताने सेवा सप्ताह साजरा करण्यासाठी मोदींनी संमती दिली. सेवा सप्ताहाच्या मागेही जनकल्याण व्हावे हीच भावना मोदींनी बाळगली. जनकल्याणाच्या भावनेनेच विविध योजना त्यांनी सुरू केल्या. मात्र, एकाही योजनेला स्वतःचे नाव दिले नाही. आपले काहीच नाही. सर्व काही देशाचे आणि देशातील जनतेचे आहे अशी त्यांची भावना. आपल्यासाठी किंवा आपल्या परिवारातील एखादय़ा सदस्यासाठी त्यांनी काही केल्याचे ऐकिवात नाही. आपण जो काही आहे ते संघाचे उपकार आहेत असे ते मानतात. आपले जीवन हे समाजासाठी आहे. अशी दृढभावनाही त्यांच्यात दिसून येते. देशाचे पंतप्रधान असताना एक प्रधान सेवक या भावनेने दिवसरात्र कष्ट उपसणाऱया या नेत्याला देशाच्या आणि देशवासियांच्या हितासाठी देव दीर्घ आयुरारोग्य देवो अशीच प्रार्थना!
राजेंद्र आर्लेकर, माजी सभापती-गोवा