प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव किल्ला तलाव आवारात सर्वात उंच तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. मात्र, हा ध्वज फडकविताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रारंभी वाऱयामुळे हा ध्वज फडकविण्यात अडचण निर्माण झाली होती. 26 जानेवारी दिवशीच ध्वज फडकविण्याचे चाक खराब झाले होते. त्यामुळे चाकाच्या दुरुस्तीचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले.
किल्ला तलावाच्या विकासाबरोबर सर्वात उंच ध्वज उभारण्यात आला आहे. बुडा व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने उभारणी झाल्यानंतर देखभालीची जबाबदारी महापालिकेकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, हा ध्वज खूपच उंच असल्याने बेळगावच्या हवामानाचा अडथळा निर्माण झाला आहे. ध्वजाची उभारणी झाल्यानंतर वाऱयामुळे ध्वज खराब झाला होता. कंत्राटदाराने तीन वेळा हा ध्वज बदलला होता. पण पावसाचे पाणी आणि वारा यामुळे ध्वज फडकविण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पावसाच्या पाण्यामुळे ध्वजाचे वजन वाढले होते. परिणामी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाला धोका निर्माण झाला आहे. ध्वज खाली-वर करण्यासाठी बसविण्यात आलेली यंत्रोपकरणे वजनामुळे निकामी झाली आहेत. त्यामुळे ध्वजाचा आकार लहान करून ध्वज फडकविण्यात आला होता. मात्र ध्वज फडकविणाऱया यंत्राचे चाक खराब झाल्याने 26 जानेवारी दिवशी हा ध्वज अर्ध्यावरच थांबला होता. यंत्राच्या दुरुस्तीचे काम निघाल्याने ध्वज फडकविण्यात आला नाही. सदर ध्वजस्तंभ उभारलेल्या कंत्राटदाराला याबाबत माहिती देण्यात आली. ध्वजाची देखरेख करण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे असल्याने हे चाक दुरुस्त करण्याची सूचना महापालिकेच्या अधिकाऱयांनी केली होती. त्यामुळे चाकाच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू करण्यात आले. पण बुधवारी हवामान खराब असल्याने दुरुस्ती करण्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून ध्वजस्तंभाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे साहाय्यक कार्यकारी अभियंते महांतेश नरसण्णावर यांनी दिली.