उचगाव / वार्ताहर
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून गांधीनगर मुख्य रस्त्यालगत बांधकाम केल्याप्रकरणी तसेच मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीस अडथळा करणारे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने काढून टाकले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून दुपारी दोन पर्यंत सुरू होती.
तावडे हॉटेल ते रूकडी बंधारा हा वीस क्रमांकाचा जिल्हा मार्ग म्हणून अस्तित्वात आहे. या रस्त्यालगत शासकीय जुन्या अधिनियमानुसार रस्त्याच्या मध्यापासून ४७ मीटर आणि नवीन आधिनियमानुसार ३० मीटर बांधकाम करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश आहे. तरीही तावडे हॉटेल शेजारी असणाऱ्या श्याम कवडमल वंजानी यांनी बांधकाम सुरु ठेवल्याने त्या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी, डंपर, यांच्या साह्याने कारवाई करत दुकानाचे शटर काढून टाकले. तसेच मुख्य रस्त्याच्या दुतर्फा काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे डिजिटल फलक रस्त्यावर लावले आहेत. रस्त्यावर काही फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून वाहतुकीस अडचण निर्माण केली आहे.
या सर्व अडचणीमुळे वारंवार या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा रस्त्यावर फलक लावणाऱ्या तसेच वाहतुकीला अडथळा करणाऱे फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने जप्त केले. या कारवाईवेळी बांधकाम धारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर कारवाई करण्यास विरोध करत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधाला न जुमानता सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई केली. या कारवाईवेळी गांधीनगरचे सपोनि सत्यराज घुले यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांनी केली. यावेळी स्थापत्य अभियंता वैभव कुंभार, श्रीकांत सुतार, संजय माळी, शिवाजी वावरे, किरण मगदूम यांनी सहभाग घेतला.