कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विशेष प्रशंसा, पहिल्या उद्रेकापासूनच पूर्वतयारी केल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कोरोना निर्मूलनासाठी केंद्र सरकार करीत असलेल्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृतीदलाने केंद सरकारची प्रशंसा केली आहे. अवघड आणि आव्हानात्मक परिस्थितीत केंद्र सरकारने अथक परिश्रम करून योग्य दिशेने प्रयत्न केले आहेत, असे प्रतिपादन कृतीदलाने केले.
या कृतीदलात 12 सदस्य आहेत. त्याची स्थापना 6 मे या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. या दलाने आपला प्रथम अहवाल शुक्रवारी सादर केला असून तो 163 पानांचा आहे. देशाची प्रचंड लोकसंख्या पाहता केंद्र सरकारने प्रशंसनीय काम केले. देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा असताना तो दूर करून पुरवठा सुरळीत करण्यासासाठी केंद्राने कौतुकास्पद कार्य केले. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू केले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण सध्या ऑक्सिजन मागणी व्यवस्था विकसीत करत असून त्याद्वारे ऑक्सिजनची नेमकी मागणी किती आणि पुरवठा किती याचा ताळमेळ लागणार आहे. अशा व्यवस्थेची अत्यंत निकडीची आवश्यकता आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले.
अचानक मागणी वाढली
कोरोनाच्या दुसऱया उद्रेकात देशभरात अचानक ऑक्सिजनची मागणी वाढली. नेहमीच्या आवश्यकतेपेक्षा अनेक पटींनी मागणी वाढल्याने प्रारंभी ऑक्सिजनच्या तुटवडय़ाला तोंड द्यावे लागले. मात्र केंद्र सरकारने जलद हालचाली करून ऑक्सिजनचे उत्पादन वाढविण्यासाठी पावले उचलली. त्यामुळे थोडक्या कालावधीतच अनेक नवी उत्पादन केंद्रे स्थापित झाली. ऑक्सिजनचे उत्पादन अवघ्या दोन महिन्यांमध्ये 8 पट वाढविण्यात आले. त्यामुळे अनेक उपचाराधीन रुग्णांचा लाभ झाला, असेही कृतीदलाच्या अहवालात आवर्जून नमूद करण्यात आले आहे.
पहिल्या उद्रेकापासूनच तयारी
ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी केंद्राने पहिल्या उद्रेकाच्या काळापासूनच तयारी केलेली होती. तसेच द्रवरूप ऑक्सिजनचा साठा करण्याची तयारीही केली होती. याचा लाभ दुसऱया उद्रेकात झाला. गेल्या वर्षीपासूनच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात आले. योग्य त्या योजना लागू करण्यात आल्या. या साऱया प्रयत्नांचा लाभ दुसऱया उद्रेकात झाला. आधीच तयारी असल्याने परिस्थिती बरीचशी आटोक्यात राहिली, असेही दलाने स्पष्ट केले.
टँकर्सची संख्या वाढविली
केंद्र सरकारने देशभर ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अत्यंत कमी अवधीत चांगली योजना केली. ऑक्सिजनचा साठा योग्य रितीने राखला गेला. रुग्णालयांना वेळेवर तो मिळेल अशी व्यवस्थाही केली. यामुळे परिस्थिती मोठय़ा प्रमाणात आटोक्यात राहिली. केंद्र ाच्या साहाय्याने केरळ, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, मेघालय, आसाम इत्यादी राज्यांनी त्यांची पोर्टल्स विकसीत केली आहेत. त्यांच्याद्वारे रुग्णालयांच्या मागणीनुसार त्यांना द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे, याचाही उल्लेख अहवालात विशेषत्वाने करण्यात आला आहे. ऑक्सिजन पुरवठय़ावर डिजिटल ट्रेकिंग व्यवस्थेद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून ही व्यवस्था उत्तम काम करीत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.