रेशनदुकानदारांचे अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून सर्व्हरडाऊनमुळे रेशन वितरण करणे कठीण बनले आहे. रेशनधारकांना दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे रेशन वितरित करणाऱया दुकानदारांवर आणि कर्मचाऱयांवर ताण पडत आहे. तसेच जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र सर्व्हरडाऊनमुळे आम्ही काहीच करू शकत नाही. तेव्हा ही समस्या दूर करण्यासाठी तातडीने सर्व्हरची समस्या दूर करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी रेशनदुकानदारांनी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
रेशन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहेत. रेशनदुकानदारांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे सर्व्हरची समस्याही अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व्हर व्यवस्थित राहिले तरच दुकानदार रेशन वितरित करू शकतात. मात्र सर्व्हरडाऊन राहिले तर रेशन वितरण करणे अवघड आहे. वारंवार सर्व्हरडाऊन होत असते. त्यामुळे रेशनधारकांना रेशन देणे अवघड जात आहे. ग्राहक दुकानदारांवर राग काढत आहेत. मात्र प्रत्यक्षात ही समस्या सरकार पातळीवरची आहे. सर्व्हर व्यवस्थित करा, तसेच इतर समस्या सोडवा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे जिल्हा उपसंचालक चंद्रशेखर कोडली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रेशनदुकानदार संघटनेचे राज्यउपाध्यक्ष राजेश तळवार, दिनेश बागडे, बसवराज दोडमनी, सरोजा दोडमनी, नारायण कालकुंद्री, पी. डी. पाटील, उमा सोनवडेकर, अरुण पाटील, आर. जी. खिलारी, एम. ए. पाटील, ए. के. मन्नोळकर, व्ही. बी. लोहार यांच्यासह रेशनदुकानदार उपस्थित होते.